नांदेड - यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने पाणीटंचाईची समस्या अजूनही 'जैसे थे'च आहे. त्यामुळे आता टँकरची संख्या १६१ वर पोहोचली आहे. एकट्या मुखेड तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाणीटंचाईची समस्या कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
नांदेडमध्ये पावसाने मारली दडी; पाणीटंचाईची समस्या जैसे थे, टँकरच्या संख्येत वाढ - मृगनक्षत्र
मृगनक्षत्र कोरडे गेले. जून महिना संपत आला तरी पारा वाढलेलाच आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. मात्र, आता पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.

मृगनक्षत्रानंतर मान्सूनचे आगमन होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे आगमन लांबले. मृगनक्षत्र कोरडे गेले. जून महिना संपत आला तरी पारा वाढलेलाच आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. मात्र, आता पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. येत्या ३० तारखेपर्यंत पाऊस झाला नाहीतर शेतकऱ्यांना जास्त कालावधीच्या पिकांची पेरणी करणे शक्य होणार नाही.
दरम्यान पावसाअभावी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आजही अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
सर्वाधिक टँकर्स सध्या मुखेड तालुक्यात सुरू आहेत. एकट्या मुखेड तालुक्यात २७ गावे आणि ४२ वाड्यांवर ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ लोहा तालुक्यात २७ टँकरद्वारे १८ गावे आणि ८ वाड्यांवर, तर नांदेड तालुक्यात २० टँकरद्वारे १२ गावे आणि ३ वाड्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. लोहा नगरपरिषदेच्या हद्दीतील ३० हजार लोकसंख्येला १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच कंधार तालुक्यात १०, माहूर तालुक्यात ८ तर देगलूर तालुक्यात ६, नायगाव आणि हदगाव तालुक्यात प्रत्येकी ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उमरीमध्ये २, तर भोकर आणि हिमायतनगर तालुक्यात प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.