महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल नऊ वर्षांनंतर नांदेडच्या दोघांची निर्दोष मुक्तता, 2012 साली 'एनआयए'ने केली होती अटक

नऊ वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या नांदेड येथील दोघांची सबळ पुराव्याअभावी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल नऊ वर्षे चाललेल्या दोघांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

By

Published : Jul 4, 2021, 10:20 PM IST

Updated : Jul 4, 2021, 10:43 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

नांदेड -नऊ वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या नांदेड येथील दोघांची पुराव्याअभावी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष म्हणून मुक्तता केली आहे. नांदेड येथील मोहम्मद इलियास व मोहम्मद इरफान यांना 1 ऑगस्ट, 2012 रोजी अटक करण्यात आली होती. नऊ वर्षांनंतर न्याय मिळाल्याने मै बेगुनाह था और कोर्टमे वही साबित हुआ, असे म्हणत त्यांनी 'ईटीव्ही भारत'समोर आनंद व्यक्त केला.

बोलताना मोहम्मद इरफान

काय आहे प्रकरण..?

मोहम्मद इलियास आणि मोहम्मद इरफान यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्ट, 2012 मध्ये नांदेड येथून अटक केले होते. राजकीय नेता, पोलीस अधिकारी व पत्रकाराला मारण्याच्या षड;यंत्रातील ते एक भाग होते, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणातील तिघांना 10 वर्ष शिक्षा

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यत इलियास व इरफानसह एकूण पाच जणांना 2013 मध्ये देण्यात आले होते. दि. 12 जून, 2021 रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक या तिघांना युएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. तर इलियास व इरफान या दोघांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

नऊ वर्षानंतर निर्दोषत्त्व सिद्ध

इलियासचा नांदेड येथे फळ विक्रीचा व्यवसाय होता. तर इरफानचा इनव्हर्टर बॅटरीचा व्यवसाय होते. सुटकेनंतर इरफान म्हणाला की, मी निष्पाप आहे, असे मी अगोदरच म्हणत होतो. पण, आमचे कोणीच ऐकले नाही. संथपणे चालणाऱ्या न्याय यंत्रणेमुळे नऊ वर्षानंतर का होईना दिलासा मिळाला आहे.

अटक झाली तेव्हा मला अक्षरशः धक्काच बसला

जेव्हा मला अटक करण्यात आली, तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या कुटुंबातील सदस्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांना काय करावे हे देखील माहीत नव्हते. ज्यांना मी ओळखतही नाही अशा लोकांसोबत माझे नाव जोडले गेले. मला अटक झाल्यानंतर माझे मित्रही जवळ येत नव्हते, असे इरफान यांनी सांगितले.

मला सामान्य नागरिकांसारखे जीवन जगायचे आहे

माझे जीवन अक्षरशः वीस वर्षे मागे गेले आहे. नऊ वर्षाच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. मी कालदेखील निर्दोष होतो आणि आजही मी निर्दोष आहे. उद्या मलाही सामान्य नागरिकांसारखे जीवन जगायचे आहे. कोणी मला दहशतवादी म्हणू नये, अशी भावना इरफान यांनी व्यक्त केली.

देशाच्या कायद्याचे पालन करतो

आम्ही देशाच्या कायदे व्यवस्थेचा सन्मान करतो, सर्व कायद्याचे पालन करतो. यामुळे आम्हाला विश्वास होता, आहे व पुढेही असेल. न्यालयाच्या आम्ही निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया इरफानचे मामा युसुफखान यांनी दिली आहे.

सोबत काम करणारे लोक नेहमी म्हणायचे तुम्हाला न्याय नक्की मिळेल - इरफानचे वडील

मी एक सरकारी कर्मचारी आहे, मला इरफानबद्दल माहित आहे. जेव्हा इरफानला अटक केली गेली आणि त्याला मुंबईला नेले गेले. तेव्हा माझ्या कार्यालयातील लोक मला सांगायची की, तुमची चांगली मुले आहेत. काहीही घडणार नाही. तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि ते निर्दोष सोडतील, अशी प्रतिक्रिया वडील मुहम्मद गौस यांनी दिली आहे.

हेही वाचा -लोहा तहसील कार्यालयात ४२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Last Updated : Jul 4, 2021, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details