नांदेड- पालकमंत्री अशोक चव्हाण यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांसह सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासन, पालकमंत्र्यांच्या अधिकृत सूत्रांकडून कोणताही दुजोरा दिला गेला नाही. परंतु काँग्रेस नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही 'साहेब लवकर बरे व्हा..' चे संदेश सामाजिक माध्यमांमधून जनतेपर्यंत पोहोचवले आहेत.
नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण हे जिल्हा प्रशासनात आघाडीवर राहिले. प्रारंभीच्या काळात त्यांनी दररोज बैठका घेतल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होत नसल्याने ते तातडीने मुंबईत गेले. तेथील सर्वपक्षीय चर्चेत सहभागी झाले. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या जागेसाठी ताणले गेले नाही आणि निवडणूक बिनविरोध झाली. आठवडाभर मुंबईत थांबलेल्या चव्हाण हे मंत्रालयातील काही महत्त्वाच्या बैठकीला व मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्व शपथ कार्यक्रमास हजर राहिले. त्यानंतर सहा दिवसापूर्वी ते नांदेडला परतले. परंतु त्यांनी जनसंपर्क टाळला. अगदी आमदारांना देखील त्यांनी भेट नाकारली. त्यावरून स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांची ही उपाययोजना असावी, असे सर्वांनाच वाटत होते. काही जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण रेड झोन असलेल्या मुंबईहून परतले असल्याने त्यांनी स्वतः विलगीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचे मानले जाऊ लागले.
रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने नांदेडच्या खासगी रुग्णालयात त्यांनी स्वतःची तपासणी केल्याचे सांगितले जाते. सोशल मीडिया आणि वेब मीडियावरील माहितीनुसार चव्हाण यांचा मुंबईतील वाहन चालक कोरोनाबाधित आल्याने त्यांनी तिथे आपल्याही घशाचे नमुने दिले होते. त्यानंतर त्यांनी नांदेडला येऊन विश्रांती घेतली. परंतु अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या अहवालाचे काय झाले, याची कोणतीही बातमी किंवा संदर्भ नांदेडला आजपर्यंत अधिकृतपणे कळालेला नाही.
नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी रविवारी रात्री जारी केलेल्या कोरोना प्रेस नोटमध्ये शिवाजीनगर भागातील ६१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तसेच एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे. वय, परिसर आणि खासगी रुग्णालयाच्या संदर्भाने अनेकांचे अंदाज, फोनाफोनी सुरू झाली. दबक्या आवाजात सुरू झालेली चर्चा टीव्हीवर नाव झळकल्याने खात्री न करता अनेक जण एकमेकांना पाठवत होते. त्यातून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या काळजीचे वातावरण तयार झाले. समर्थक आणि विरोधक एकमेकांना फोन करून खात्री करू लागले. महत्वाचा दुवा हाती लागला असावा, तेव्हाच काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फेसबुक व इतर सोशल मीडियावर जाहिराती तयार करून 'साहेब, लवकर बरे व्हा..' असे संदेश झळकवले.