महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2020, 6:09 AM IST

Updated : Jul 14, 2020, 8:12 AM IST

ETV Bharat / state

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेष : जलसिंचन अन् शाश्वत विकासाची रोवली मुहुर्तमेढ

वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील मागासलेल्या मराठवाड्याचे भविष्य उज्जवल करण्यासाठी गोदावरी खोऱ्यावर विविध ठिकाणी मोठी धरणे बांधावे, असा निर्धार डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांची समृद्धी करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नाही, ही शाश्वत विकासाची जाणीव डॉ. शंकरराव चव्हाण यांना होती.

shankarrao chavan birth anniversary special  shankarrao chavan irrigation work  dam in shankarrao chavan govt  शंकरराव चव्हाणांचे जलसिंचनात कार्य  शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेष  शंकरराव चव्हाणांनी बांधलेले धरणं
शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेष : जलसिंचन अन् शाश्वत विकासाची रोवली मुहुर्तमेढ

नांदेड - एकिकडे भौतिकीकरणामुळे मानव विकासाच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचला आहे. परंतु, दुसरीकडे अनेक नैसर्गिक संकट निर्माण होत आहे. आधुनिक काळात जलसंकटाची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. जलसिंचन क्षेत्रात डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. जलसिंचन क्षेत्रात अतुलनीय व शाश्वत कामगिरी करून डॉ. शंकरराव चव्हाण यांनी देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपल्या कार्याचा आगळा-वेगळा ठसा निर्माण केला.

वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील मागासलेल्या मराठवाड्याचे भविष्य उज्जवल करण्यासाठी गोदावरी खोऱ्यावर विविध ठिकाणी मोठी धरणे बांधावे, असा निर्धार डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांची समृद्धी करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नाही, ही शाश्वत विकासाची जाणीव डॉ. शंकरराव चव्हाण यांना होती.

महाराष्ट्रात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने व विचाराने अनेक लघु व मोठे जलप्रकल्प उभे राहिले. यातून हजारो, लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस कारणीभूत ठरले. या माध्यममातून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला व यातूनच औद्योगिक विकास कार्यास चालना मिळाली. म्हणूनच डॉ. शंकरराव चव्हाण यांना विकासाचा महामेरू, आधुनिक भगीरथ, जलसंस्कृतिचे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राजकारणातील हेडमास्तर, अशा कितीतरी विशेषनांनी संबोधले जाते.

जलसिंचन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी -

एकीकडे कृष्णा खोऱ्यावर विविध धरण बांधल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येत होता. पण दुसरीकडे मराठवाडा होरपळत होता. कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर गोदावरी खोऱ्यातही धरणे व्हावी व मराठवाड्याचा विकास व्हावा, असे डॉ. शंकररावजी चव्हाण यांना वाटत होते. राज्याच्या व देशाच्या विविध मोठ्या पदावर काम करीत असताना त्या पदांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी डॉ. शंकररावजी चव्हाण हे प्रयत्नशील राहिले. त्यांनी लघु, मध्यम व मोठी अशी अनेक धरणे बांधली.

जायकवाडी प्रकल्प(नाथसागर) -
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचा 'जायकवाडी जलसिंचन प्रकल्प' महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचनप्रकल्प आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या धोरण व कार्यातून अफलातून अशा या प्रकल्पाची निर्मिती झाली. या प्रकल्पास ‘नाथसागर’ असे संबोधले जाते. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पास तीव्र स्वरुपाचा विरोध झाला. औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक गावे या प्रकल्पाच्या जलाशयात बुडणार होती म्हणून दोन्ही बाजूने या धरणाचा विरोध झाला. अफाट विरोध होऊनसुद्धा चव्हाण यांनी या धरणाचे काम थांबवले नाही. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला ते सामोरे गेले. अनेक प्रसंगात त्यांना कटु अनुभवसुद्धा आला, ते त्यांनी सहजपणे स्वीकारलेत. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले व कालांतराने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या धरणाची साठवणूक क्षमता २,९०९ दशलक्ष घनमिटर असून जायकवाडी प्रकल्पामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड व अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार हेक्टर कोरडवाहू जमिनीची तहान शमली. धरण बांधणीच्यावेळी सर्वात मोठा प्रश्न पुनर्वसनाचे काम होते व यासोबतच अनेक प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करून हा जलाशय कृतीत आला. यामुळे आज औरंगाबाद, जालना, बीड, नगर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांची शेती तर ओलिताखाली आलीच, पण या भागाचे कायमचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेत. आज मराठवाड्यातील मोठ्या शहरामध्ये औद्योगिकीकरण वाढत असून त्यास पाणीपुरवाठा याच जलाशयातून होतो.

येलदरी धरण -
शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूरपासून जवळच पूर्णा नदीवर येलदरी या धरणाची निर्मिती झाली. या धरणाचा लाभ हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. या धरणावरती विद्युत निर्मिती केंद्र सुद्धा उभारण्यात आले आहे. या धरणाचे पाणी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर या तालुक्यांना सुद्धा मिळत होते. या धरणाचा एक कालवा (कॅनाल) नांदेड शहरालगत असलेले कामठा बु. पर्यंत येत होता. नांदेडचे विस्तारित विमानतळ व नांदेड शहराच्या विस्तारीकरणामुळे हा कालवा बंद पडला व या कालव्यावर रोड बांधण्यात आला. पूर्वी नांदेड तालुक्यातील भाग म्हणजे अर्धापूर तालुक्यात पहिल्यांदा ज्या धरणाचे पाणी आले ते म्हणजे येलदरी, सिद्धेश्वर धरण होय. या धरणाच्या पाण्यावरच अर्धापूर व नांदेड शिवारात केळीचे पीक घेतले जाई. म्हणूनच या भागातील जनता डॉ. शंकरराव चव्हाण यांना दैवत मानतात.

सिद्धेश्वर धरण -
हिंगोली जिल्ह्यातील औंढा व वसमत तालुक्यातील सीमेवर सिद्धेश्वर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम १९६२ साली डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखली पूर्ण करण्यात आले. या धरणाच्या निर्मितीमुळे दुष्काळी भगातील १ लाख २० हजार एक्कर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. यात डॉ. शंकरराव चव्हाण यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे.

विष्णूपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प -

डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कल्पनेतून नांदेड शहरालगत गोदावरी नदीवर उपसा जलसिंचन प्रकल्पाची उभारणी झाली. कसल्याही प्रकारचे पुनर्वसनाची समस्या न उद्भवता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे कुठल्याही प्रकारची जमीन पाण्याखाली गेली नाही. सन १९८३ मध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प पूर्णतः उपसा पद्धतीचा आहे. यामध्ये विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करून ते उर्ध्वरण नलिकेव्दारे टेकड्यावर नेले व तेथून कालव्याव्दारे शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण झाला असता तर जवळपास २८ हजार ३४० हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. परंतु, प्रकल्पाचे उपसा उर्ध्वरण नलिकेचे काम अर्धवट झाले आहे. आज या जलाशयातून नांदेड शहर व परिसरातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे धोरण हे पुढचे अनेक वर्ष ग्राह्य धरून आखले जात होते याची प्रचीती आज सर्वांना येत आहे. डॉ. शंकरावजी चव्हाण यांच्या अंत्यविधीच्यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या जलाशयाचे डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प (शंकरसागर) असे नामांतर केले.

इसापूर धरण -

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात हे धरण बांधले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात हिंगोली, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यातील ९५ हजार ३५ हेक्टर जमीन पाण्याखाली आली. हे धरण महाराष्ट्रातील मोठ्या धरणापैकी एक धरण आहे. या धरणाला दोन कालवे असून उजवा कालवा ११७ किमी मराठवाड्यासाठी आणि ७२ किमीचा डावा कालवा विदर्भासाठी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव, भोकर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद या तालुक्यांना लाभ होतो. या धरणाच्या कालव्यांची वैशिष्ट्ये डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. मोठ-मोठ्या माळातून हा कालवा गेलेला आहे. काही ठिकाणी हा कालवा जमिनीतून नेलेला आहे. वारंगा फाटा येथील कालव्याचा भुयारी मार्ग, भोकर तालुक्यातील भुयारी मार्ग हे बघण्यासारखे आहे. या धरणाचे पाणी हदगाव, अर्धापूर, भोकर, मुदखेड उमरी तालुक्यात आणण्यासाठी विशेष असे भुयारी मार्ग आहेत. वारंगा येथील कालव्याची लांबी, रुंदी व खोली बघून सामान्य माणूस आश्चर्यचकित होतो.

इतर जलसिंचन प्रकल्प -

डॉ. शंकरराव चव्हाण हे राज्याचे पाटबंधारे मंत्री म्हणून निवड झाल्याबरोबर जायकवाडी प्रकल्प हाती घेतला. त्याचप्रमाणे भीमेवरील उजनी धरण, कोकणातील भातसा धरण, नागपूरमधील पेंच प्रकल्प, जळगाव जवळच्या हातनूर प्रकल्प, लातूर जवळील मांजरा प्रकल्प, अमरावती जवळचा अप्परवर्धा, वारणेवरील खुजगाव, मुळा धरण, मनार, निम्न तेरणाख दुधना, तितरी, सूर्या, मांजरा, नांदूर मधमेश्वर, लेंडी, खडकसावला, इटियाडोह, पूर्णा, मुळा, काळमावाडी, गिरणा, घोड अशी कित्येक लहान मोठी जलसिंचन प्रकल्पाची निर्मिती विरोध सहन करून केली. डॉ. शंकरराव चव्हाण यांना फार दूरदृष्टी होती. त्यांचा पाटबंधारे खात्यासंबंधीचा अभ्यास दांडगा व प्रचंड होता. ज्यांनी जलसिंचन प्रकल्पांना थोड्याश्या समस्यामुळे विरोध केला, भविष्यात त्यांनीच डॉ. शंकरराव चव्हाण यांचे गुणगौरव गायले.

डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे जलव्यवस्थापन, जलसिंचन क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्रात अनेक लहान-मोठ्या जलसिंचन प्रकल्पांची निर्मिती झाली. महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. जलसिंचन प्रकल्पामुळे केवळ जमीन बागायती झाली नाही, तर हजारो गावांचा, अनेक शहरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. मराठवाड्यात जेव्हा कोरडा दुष्काळ पडत असतो त्यावेळेस शंकरराव चव्हाण यांनी बांधलेल्या धरणातून पाणी दुष्काळी भागात उपलब्ध करून दिले जाते.

Last Updated : Jul 14, 2020, 8:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details