नांदेड - नरेंद्र मोदी हा अगोदर वेगळाच माणूस होता. पंतप्रधान झाल्यानंतर वेगळाच दिसला. मोदींनी केसाने गळा कापून जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड येथे केली. राज ठाकरे यांनी भाषणात भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.
शहरातील नवा मोंढा येथील मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खूप बोलले काहीच केले नाही. मोदी सतत निवडणुकीच्या मूडमध्ये असतात. मोदी नांदेडला आले होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांबदल, बेरोजगारी बद्दल काहीच बोलले नाही. आपण केलेल्या कामावर मत न मागता, ते जवानांच्या नावावर मत मागत आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
मराठवाड्यात मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. हेच का अच्छे दिन. मराठवाड्यात पाण्याची पातळी प्रचंड खोल गेली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ५० ते ६० वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. सरकार मात्र लाखो विहिरी बांधल्याचे म्हणतंय. पण त्या विहीर दाखवायला तयार नाहीत. जनतेने भरभरून मत देऊनही सतत खोट बोलत आहेत. जेवढ्या गोष्टीवरती हजारो कोटी रुपये खर्च केले. त्यापूर्णच झाल्या नाहीत. त्याबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत, असे ते म्हणाले.
राज म्हणाले, मी कोणाच्या प्रचारासाठी आलो नसून भारताच्या राजकीय क्षितिजावरून मोदी-शाह यांचे नाव काढून टाकण्यासाठीच मी नांदेडात आलो आहे. हे दोघे निवडणूक जवळ येईल, तशी ते युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करतील, असे मी आधीच म्हटले होते आणि झालेही तसेच, जवानांच्या नातेवाईकांनी पुरावे मागितले तर देशद्रोही म्हणतात. आम्हाला सैन्यावर विश्वास आहे. वैमानिक त्यांचे काम बजावून आले. मात्र, जागा कोणती होती, हे महत्वाचे आहे. मदरसा आजही तिथे आहे. हे सरकार आमच्याशी खोट का बोलत आहेत. सत्य परिस्थिती समोर आणली जात नाही, असेही ते म्हणाले.