महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2020, 6:12 AM IST

Updated : Jul 14, 2020, 8:10 AM IST

ETV Bharat / state

निवडणूक आयोगालाही न्यायालयात खेचणारे पहिले गृहमंत्री, शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास

शंकरराव चव्हाणांनी मराठवाड्याचे भाग्यविधाते, भगीरथ, अशी बिरुदावली मिळवली. त्यांना मराठवाड्यातील जनता दैवत मानत होती. कोणालाही हेवा वाटावा, अशीच त्यांची राजकीय कारकिर्द होती. अशा या शंकररावांचा आज जन्मदिवस आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दीचे असून त्यानिमित्त ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

shankarrao chavan political journey  shankarrao chavan birth anniversary  shankarrao chavan 100th birthday  शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास  शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी  शंकरराव चव्हाण जन्म
शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास

नांदेड - राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद अन् विधानसभा, अशा केंद्र अन् राज्यातील चारही सभागृहांचे सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण तब्बल ५० वर्ष राजकारणात सक्रीय होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या गृहमंत्रिपदार्यंत थेट मजल मारली. मराठवाड्याचे भाग्यविधाते, भगीरथ, अशी बिरुदावली मिळवली. त्यांना मराठवाड्यातील जनता दैवत मानत होती. कोणालाही हेवा वाटावा, अशीच त्यांची राजकीय कारकिर्द होती. अशा या शंकररावांचा आज जन्मदिवस आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दीचे असून त्यानिमित्त ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

निवडणूक आयोगालाही न्यायालयात खेचणारे पहिले गृहमंत्री, शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास

हैदराबाद मुक्तीसंग्राम -

शंकररावांचा जन्म १४ जुलै १९२० ला पैठण इथं शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच प्राथमिक शिक्षणही पैठणमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठातून बीए अन् एल. एल. बी करून १९४५ मध्ये वकिलीची सनद मिळवली. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले. १३ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकरावांच्या कार्यकर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

राजकीय पर्व -

कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नसताना शंकरराव राजकारणात उतरले. पहिल्या निवडणुकीत त्यांच्या पदरी पराभव आला. पण, १९५३ मध्ये ते नांदडेचे पहिले नगराध्यक्ष झाले. त्यानंतर शंकररावांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकारणाचा आलेख वाढतच गेला. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात सामिल झाला आणि शंकररावांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात उपमंत्री पद मिळाले. १९६०मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर शंकररावांनी पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्रीपद भूषवले. त्यानंतर १९७२ ते फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्रीही राहिले. पुढे २१ फेब्रुवारी १९७५ ला त्यांनी महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले होते. मात्र, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषीत केली आणि शंकररावांना अवघे दोन वर्ष अर्थात १९७७ पर्यंतच मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ मिळाला. याच काळात त्यांनी जायकवाडी धरणाचे काम पूर्ण केले. त्यासाठी त्यांना विरोधही झाला. त्यावेळी जायकवाडी धरण झाले तर ठिक, नाहीतर मी राजीनामा देणार, अशी भूमिका शंकररावांनी घेतली होती. अखेर, जायकवाडी धरण झाले आणि शंकरराव मंत्रिपदी कायम राहिले. त्यांच्याच प्रयत्नाने मराठवाड्याला पाणीही मिळाले. परत १९८६ ला त्यांना महराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळाले आणि त्यांनी नांदेडमधील विष्णूपुरी धरणासाठीही प्रयत्न केले. विष्णुपुरीच्या माध्यमातून नांदेडकरांना पाणी मिळाले.

निवडणूक आयोगाला न्यायालयात खेचणारे पहिले गृहमंत्री -

शंकररावांनी १९८० मध्ये लोकसभा जिंकली अन् थेट केंद्रात पोहोचले. त्यांना शिक्षणमंत्रीपदही मिळाले. १९८१ ते १९८४मध्ये ते संरक्षण खात्याचे मंत्री झाले, तर १९८४ मध्ये राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात शंकरराव गृहमंत्री झाले. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक घेत निवडणूक आयोगालाही न्यायालयात खेचणारे ते पहिले गृहमंत्री होते. १९८९ ते १९९० या काळात त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. १९८९ ते १९९४ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा गृहमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आसामचे आंदोलन, पंजाबचे ब्लू स्टार ऑपरेशन, बाबरी मशिद प्रकरण हे सर्व शंकरराव गृहमंत्री असतानाच घडले. पण, त्यांनी अगदी अभ्यासू वृत्तीनं सर्व प्रश्न हाताळले.

चारित्र्यसंपन्न आणि शिस्तशीर मुख्यमंत्री म्हणून शंकररावांची ओळख -

कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने हाताळला, त्यावरून हे सिध्द होते. ते रामानंद तीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासूवृत्ती हे त्यांचे गुणविशेष होते. चारित्र्यसंपन्न आणि शिस्तशीर मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांची ओळख आहे. एक गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकररावांनी अदम्य इच्छाशक्ती आणि खडतर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. कायद्याचे पदवीधर असलेल्या शंकररावांनी प्रारंभी जुलमी, निजामी राजवटी विरुद्धच्या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सहवासात त्यांच्या राष्ट्रीय विचारांना गती मिळाली.

जायकवाडीसह अनेक धरणांची निर्मिती -

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. जायकवाडी हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प शंकररावांच्या विकासविषयक दृष्टीकोन दाखवणारा आहे. याशिवाय उजनी, उर्ध्व पैनगंगा, पैनगंगा, अप्पर मांजरा अशी प्रकल्पांची मालिकाच त्यांनी निर्माण केली. पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्यासाठी सिंचन आयोग स्थापन केला. बागायती पिकांना पाटाचे पाणी फक्त आठ महिने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील ओलिताखालील जमिनीचे क्षेत्र वाढले. याशिवाय कापूस एकाधिकार योजना, घरकूल योजना, उर्दू अकादमीची स्थापन, गृहनिर्माण मंडळ, आदिवासी आश्रमशाळा, रेल्वे रुंदीकरण यासारखे कार्यक्रम राबविण्यात आले. शंकरराव यांची दूरदृष्टी, अभ्यासूपणा व ग्रामीण भागाविषयी निष्ठा असलेला नेता अशी ओळख आहे. नैतिक मूल्ये हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. म्हणूनच त्यांच्या कार्याला नैतिकतेचे अधिष्ठान लाभले होते.

मराठवाड्याच्या भगीरथाचा अस्त -

शंकरराव स्वामी रामानंदतीर्थ यांना गुरू मानत होते. त्यांनी दिलेला कानमंत्र त्यांनी शेवटपर्यंत सांभाळला. सत्तेसाठी कधीही मुद्दाम प्रयत्न केले नाही, लाजीरवाणे खटाटोप केले नाही. त्यांचे नेतृत्व विलक्षण होते म्हणून पदे त्यांच्याकडे चालत आली. शंकररावांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कामे केली.पण, कामाचा कधीही गाजावाजा केला नाही. १९५२ ते २००२ अशी ५० वर्ष ते सत्तेते होते. कोणालाही हेवा वाटावा अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. पण, २००४ ला मराडवाड्याचा भगीरथ अस्ताला गेला. पण, शंकरराव चव्हाण व्यक्तीमत्व, नेतृत्व, कतृत्वामधून समाजाला सदैव सुसंस्काराची प्रेरणा देऊन गेले.

Last Updated : Jul 14, 2020, 8:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details