महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर बचावकार्यात एनडीआरएफ जवानांच्या सोबतीला नांदेडचे प्रशिक्षणार्थी

पुराच्या पाण्यात हजारो नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ व सैन्य दलाची पथके प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्याबरोबरच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले शंभरावर प्रशिक्षणार्थी या बचाव कार्यात मोलाची भूमिका पार पाडत आहेत.

By

Published : Aug 10, 2019, 1:28 PM IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

नांदेड -पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुरामुळे भीषण परिस्थिती ओढावली आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने पुराच्या पाण्यात हजारो नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ व सैन्य दलाची पथके प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्याबरोबरच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले शंभरावर प्रशिक्षणार्थी या बचाव कार्यात मोलाची भूमिका पार पाडत आहेत.

पूर बचाव कार्यात एनडीआरएफ जवानांच्या सोबतीला नांदेडचे प्रशिक्षणार्थी

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यासाठी एनडीआरएफचे पथक कार्यान्वित आहे. नगर येथील मुख्यालयातून प्रशिक्षित पथकांचे नियंत्रण केले जाते. राज्याची व्याप्ती लक्षात घेता आपत्ती काळात घ्यावयाची खबरदारी व उपाययोजनांच्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जातात.राज्यपाल कार्यालयाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय शिबीर घेण्यात येते. येथे प्रशिक्षित विद्यार्थ्यांना 'चॅन्सलर्स ब्रिगेड' असे संबोधले जाते. यावेळचे शिबीर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ४ ते १४ जून या कालावधीत पार पडले.

एनडीआरएफ च्या पथकांनी शिबिरात सहभागी साडेबाराशे युवक-युवतीला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले होते. शिबिरार्थ्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पावसाने थैमान घातल्याने अभूतपूर्व पूरस्थिती ओढावली आहे. हजारो नागरिक पुरात अडकल्याने बचाव कार्य तोकडे पडत आहे. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कोल्हापूर, सातारा, सांगली येथील जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सेवा बजावत आहेत.

पुराची भीषणता पाहता त्यांना प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी करुन घेतले नसले तरी रेस्क्यू पथकांना सहाय्यभूत ठरतील, अशी कामे हे प्रशिक्षणार्थी करत आहेत. कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती पाहता आणखी काही मदत करता येवू शकेल का? या अनुषंगाने नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे समन्वयक तथा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "कोल्हापूर विद्यापीठातील 'रासेयो'चे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले आहे. पुरामुळे रस्त्यांचा संपर्क तुटला आहे, अशावेळी नांदेड वा अन्य ठिकाणाहून मदतीसाठी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना इथवर पोहोचणे शक्य नाही. स्थानिक रहिवासी असलेले प्रशिक्षणार्थी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सहाय्यभूत सेवा बजावत आहेत. पूर ओसरल्यावर अन्य मदतीसाठी स्वारातीम विद्यापीठातील रासेयोच्या पथकाची तेथे जाण्याची तयारी आहे."

नांदेड येथे प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या तुकडीतील पुरुषोत्तम राणा, राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असून त्यांचे पथक कराड भागात मदतकार्य करत आहे. मदत कार्यासाठी आवश्यक साधनांचा तुटवडा असल्याने सध्यातरी प्रशिक्षणार्थ्याना येथे येण्याचा धोका पत्करु नये, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details