नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातच रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. एक प्रकारे माणूस चंद्रावर तरी गाडी चालवू शकतो, पण ग्रामीण भागातील रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेलगाव (ता.अर्धापूर) येथील नागरिक व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे कामाला नेमकीच सुरुवात झाली असताना काम पूर्ण झाल्याचा फलक या ठिकाणी लावून बिलेही उचलण्यात आली आहेत. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी घेतलेला हा आढावा
काम पूर्ण न होताच लावला काम पूर्ण झाल्याचा फलक आणि बिलाची रक्कमही घेतली
नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून दाभड ते शेलगांव या २.९४ किमी रस्त्यासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी ५ लाख ९५ हजारांचा निधी मंजूर झाला होता. कंत्राटदाराकडून रस्त्यावर लावलेल्या बोर्डानुसार, ११ सप्टेंबर २०२० रोजी रस्त्याचे काम पूर्ण झाले आणि १२ सप्टेंबर २०२० पासून रस्त्याचा पाच वर्षांचा देखभाल कालावधी सुरू झाला आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुदही करण्यात आली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला खडीकरणाचेही काम पूर्ण झालेले नसताना, बिल दिल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. केवळ गिट्टी आणि मुरुम पसरवून रस्ता पूर्ण करता येतो का ? असा सवाल येथील नागरीकांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावर अनेकदा अपघाताच्या घटना
पावसाळ्यापूर्वी गिट्टी पसरवून त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून वेळ मारून नेली. पावसाळ्यात संपूर्ण मुरूम रस्त्यावरून वाहून गेला आहे. सध्या दुचाकी चालकांना गिट्टी उघड्या पडलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. दिवाळीमुळे या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर एक अपघात झाल होता. दिवाळीसाठी बहिनीला घरी घेऊन येत असतांना या व्यक्तीचा अपघात झाला. या अपघातात भऊ आणि बहीन दोघेही जखमी झाल्याने ऐन दिवाळीत त्यांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली.