महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्धापुरात अग्निशमन दलाची इमारत अर्धवटच; संबंधितांवर कारवाईची मागणी

जिल्ह्यात महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये अर्धापुर येथे अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम करायचे होते. हे बांधकाम पुर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १०० टक्के विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सादर करुन अपहार केला. अशी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासह जिल्हाधिकारी व संबंधीतांकडे देवून, या प्रकरणी चौकशी करुन संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

By

Published : Jul 17, 2019, 12:02 PM IST

अग्निशमन दलाच्या इमारतीचे अर्धवट स्थितीत बंद पडलेले बांधकाम

नांदेड- जिल्ह्यात महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये अर्धापूर येथे अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम करायचे होते. मात्र, हे बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १०० टक्के विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सादर करुन अपहार केला. अशी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासह जिल्हाधिकारी व संबंधीतांकडे दिली आणि या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अग्निशमन दलाच्या इमारत बांधकामासाठी शासनाने २०१६-१७ मध्ये ६७ लाख ९४ हजार ६४० रुपायांचा निधी मंजूर केला होता. यात नगर पंचायतीचा २० टक्के हिस्सा, १६ लाख ९८ हजार ६६० रुपये मिळवून ८४ लाख ८३ हजार ३०० रुपये निधीत, एका वर्षात सर्व अटींसह इमारत पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु इमारतीचे बांधकाम अद्याप अर्धवट स्थितीत बंद पडलेले आहे. हे काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १०० टक्के विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी प्रशासनाकडे सादर केले. यावरुन या कामात अपहार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

गेल्या वर्षी १८ सप्टेंबर २०१८ ला, अर्धापूर शहराच्या फुले नगर भागातील एका घराला आग लागून एक महिला मृत्यूमुखी पडली होती. यावेळी येथे अग्निशमन दलाची व्यवस्था नसल्यामुळे नांदेडहून अग्निशमन दलाचे वाहन बोलवावे लागले होते. यामुळे लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच शहरात अग्निशमन दलाची व्यवस्था नसतानाही, नगर पंचायत मालमत्ता धारकांकडून अग्निशमन कर वसूल करते. अनेक प्रकरणात माहितीच्या अधिकारात मागीतलेली कोणतीही माहिती नगर पंचायतीकडून पुरविली जात नाही, असे देखील या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

अर्धापूर येथील नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून, अनेक विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला. ही कामे शासकीय कंत्राटदारांच्या नावे घेऊन मुख्याधिकारी व काही नगरसेवकांनी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केलीत, यामुळे प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबंधीताविरुद्ध कारवाई करावी असे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी(नपप्र), खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी अर्धापूर यांना देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details