नांदेड : गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये 'क्यार' व 'महा' या दोन चक्रीवादळांमुळे, अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानी पोटी 51 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचे पुढील आठवड्यात वितरण होणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार व महा या चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात खरीप व मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. याचाच परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी 50 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.