नांदेड -सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीकरीता दक्षिण मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यापैकी काही उत्सव विशेष गाड्यांमध्ये प्रवाशी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्यावतीने देण्यात आली.
नांदेड : अत्यंत कमी प्रवासी संख्या असल्यामुळे काही उत्सव विशेष गाड्या रद्द! - indian railway news
काही उत्सव विशेष गाड्यांमध्ये प्रवासीसंख्या अत्यंत कमी असल्यामुळे अशा गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यानुसार नांदेडमधीलही काही गाड्या रद्द झाल्या आहेत.

रद्द गाड्या पुढीलप्रमाणे –
गाडी क्र. ०७६१४/०७६१३ नांदेड-पनवेल नांदेड ही दररोज सुटणारी उत्सव विशेष रेल्वेगाडी येत्या २३ नोव्हेंबरपासून व पनवेल येथून २४ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. (गेल्या २३ ऑक्टोबर रोजी ही रेल्वेगाडी नियमितपणे सुरू करण्यात आली होती.)
गाडी क्र . ०७६८८/०७६८७ धर्माबाद - मनमाड - धर्माबाद ही उत्सव विशेष रेल्वेगाडी धर्माबाद येथून १५ नोव्हेंबर मनमाड येथून परतीच्या प्रवासात १५ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. याचाच अर्थ १४ नोव्हेंबरला मनमाडहून धर्माबादकडे परतणारी रेल्वे नंतर मनमाडकडे जाणार नाही.
गाडी क्र . ०७६४१/०७६४२ काचिगुडा-नांदेड-पूर्णा-अकोला नारखेड व परत काचिगुडा (सोमवार-मंगळवार वगळता) येत्या १४ व १५ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र . ०७६३९ / ०७६४० अकोला - काचिगुडा - अकोला ही विशेष रेल्वेगाडी (सोमवार व मंगळवारी ) या इंटरसिटीच्या वेळेत घावणाऱ्या उत्सव विशेष रेल्वेगाड्या येत्या १६ व १७ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांची होणार गैरसोय
या विशेष रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे दिवाळीनंतर प्रवाशांची बाहेरगावी जाण्याचे बेत बिघडले आहेत. अचानक या गाड्या रद्द केल्यामुळे इतर रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे. मुंबईला जाणारी पर्यायी पनवेल एक्सप्रेस बंद केल्यामुळे नंदीग्रामच्या वेळेत धावणाऱ्या उत्सव विशेष रेल्वेगाडीवर आणखी ताण पडणार आहे. तसेच हायकोर्टच्या वेळेतील एकही रेल्वेगाडी उपलब्ध नसल्यामुळे औरंगाबादला प्रशासकीय व न्यायालयीन कामासाठी जाणाऱ्या व परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.