महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढत्या खर्चामुळे साखर गाठींचा व्यवसाय धोक्यात

वाढत्या महागाईमुळे साखर गाठींचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

By

Published : Mar 21, 2019, 6:50 PM IST

साखर गाठीचा व्यवसाय धोक्यात

नांदेड- अर्धापूर शहरातील मारोती मंदिर परिसराजवळ पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने साखरेच्या गाठी, हार, कंगण तयार करणारा कारखाना सुरू आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे साखरेचे दर वाढले. गाठी तयार करण्यासाठी लागणारा साहित्याचा खर्च, मजुरांचा खर्च आणि उत्पादनात येणारा तोटा, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे साखरेच्या गाठी तयार करण्याचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येथील हार, कंकण आणि साखरेच्या गाठी बनविण्याचा व्यवसायदेखील प्रसिद्ध आहे. येथील साखरेच्या गाठी म्हेसा, नांदेड, बाळापूर, वसमत व अर्धापूर तालुक्यात विक्रीसाठी जातात. हा व्यवसाय पारंपरिक असून पिढ्यानपिढ्या चालत आहे. महाशिवरात्री, होळी सणापासून ते गुढीपाडव्यापर्यंत साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी कुटुंबासह मजूर राबत आहेत. मात्र, या व्यवसायाला गेल्या ५ वर्षांपासून महागाईची झळ बसत गेल्याने उतरती कळा लागली.

वाढत्या महागाईमुळे साखरेच्या किंमती वाढत गेल्या. त्याला लागणारे साहित्य साखर, हाड्रोलिक पावडर, तुरटी, दूध, लाकूड, कोळसा, मजुरांवरील खर्च वाढत गेला. मात्र, उत्पादन केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न घटत गेले. साखरेच्या गाठी तयार करणारा कारखाना चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. साखरेच्या गाठी महागाईमुळे अधिकच कडू होऊ लागल्या. शेवटी महागाईमुळे हा व्यवसाय करणे परवडत नाही. आता साखरेच्या गाठी, हार, कंगण शहरात विक्रीसाठी येत असून ते नाजूक असल्याने जास्त प्रमाणात चुरा होऊन नुकसान होत आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.

देवाण-घेवाणची प्रथा

पूर्वी आपल्याच कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी कंगण, हार घेतला जात असे. तसेच नातेवाईक किंवा शेजारी घरासारखे संबंध असलेल्या व्यक्तींच्या मुला-मुलींसाठी कंगण, हार देण्याची प्रथा होती. २ ते ३ किलो कंगण, हार खरेदी करणारे ग्राहक मिळायचे. त्यामुळे माल जास्त खपत असे. पूर्वी साखरपुडा, लग्न ठरवताना नारळगोटा देण्याची प्रथा होती. आता ही प्रथा बंद झाली आहे. महागाई वाढली असली तरी नात्यातील गोडवा सुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे साखर गाठींची विक्री कमी होत आहे. जास्त उत्पादन करूनही उठाव नसल्याने तोटा होतो, अशी सबब व्यावसायिकांकडून ऐकायला मिळत आहे.

साखर गाठीचा व्यवसाय धोक्यात

तोटा सहन केला

साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी साखर, हाड्रोलिक पावडर, तुरटी, दूध, लाकूड, कोळसा असे साहित्य लागत असे. दिवसाला १०० किलोच्या मालापैकी ७० किलोचा माल तयार व्हायचा आणि ३० किलो माल खराब होत असे. उरलेल्या साखरेच्या पाकामध्ये दूध टाकून माल तयार करावा लागत असे. नाही तर तेवढा माल फेकला जायचा. तसेच कारागिराला ५०० रुपये रोज, मजूर महिलांना १०० रुपये रोज द्यावा लागतो. वाढत्या महागाईमुळे खर्च वाढत असल्याने उत्पन्नात तोटा सहन करावा लागत आहे. देवाण-घेवाणीच्या प्रथेमुळे प्रत्येक व्यक्ती माल खरेदी करत होती. आता चित्र बदलले आहे, अशी माहिती दशरथ रघुनाथ लोणारे व गंगाधर खंडागळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details