महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : सरकारी जमिनीवर ४० वर्षांपासून अतिक्रमण; अर्धापूरमध्ये पोलीस बंदोबस्तात कारवाई

शहरातील विविध भागात सरकारी जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे शहराला बकाल स्वरुप आले आहे. अशात नगरपंचायतने अतिक्रमणांर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

By

Published : Oct 9, 2020, 7:37 PM IST

अतिक्रमण कारवाई
अतिक्रमण कारवाई


नांदेड- जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील तहसील कार्यालयासमोर सरकारी जागेवर ४० वर्षांपासून अतिक्रमण आहे. या अतिक्रमणाविरोधात नगरपंचायतने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळपासून सायंकाळपर्यंत कारवाई केली. अतिक्रमणधारकांचा विरोध झुगारून पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हाटविण्यात आले आहे.

अर्धापूर शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवातीला विरोध करण्यात आला. मात्र, प्रशासनाने कारवाई लावून धरल्याने दुपारनंतर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले. जेसीबीच्या मदतीने कारवाई सुरू असताना बघ्यांची गर्दी केली होती.



शहरातील विविध भागात सरकारी जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे शहराला बकाल स्वरुप आले आहे. या अतिक्रमणाविरुद्ध पोलीस, महसूल, बांधकाम, नगरपंचायत विभागाने संयुक्त कार्यवाही करून अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आली होती.

अर्धापूरमध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई

अशी झाली कारवाई-

शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील गट क्रमांक ६०० मधील काही भागात नगरपंचायतकडून व्यापारी संकूल बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी नगरपंचायतीने महसूल प्रशासनाला जागा मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतराचे आदेश दिले होते. या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सकाळी सुरूवात झाली. अतिक्रमणधारकांनी सकाळी तीव्र विरोध करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार सुजित नरहरे, पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे , नगर अभियंता नागनाथ देशमुख, नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी कायदेशीर बाजू समजावून सांगून अतिक्रमणधारकांना सहकार्य करण्यास सांगितले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यापूर्वी गुरुवारी (८ ऑक्टोबर) लोकप्रतिनिधी व अतिक्रमणधारकांची बैठक घेवून प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले-
अर्धापूर शहरातील विविध सरकारी जागा, गायरान, नाले, रस्ता आदी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. जागा धरणे, कब्जा करणे व किरायाने देणे असा गोरखधंदा सुरू आहे. यातून वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. शहरातील विविध भागातील अतिक्रमणाविरुद्ध धडक मोहीम घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details