महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2019, 7:02 AM IST

ETV Bharat / state

नांदेडमधील १० गावांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध), बेल्लूर (खु), जाफलापूर, चिंचोली, बेल्लूर (बु), आल्लूर, सिरजखोड, रामेश्वर, रामपूर, नेरली ह्या गावात गेल्या ७० वर्षांपासून लोकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.

nanded-boycott

नांदेड - धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या परिसरात असलेल्या १० गावांना देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या गावांतील जनतेत शासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दहा गावातील मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे लेखी निवेदन येथील तहसीलदारांना दिले आहे.

हेही वाचा -रस्त्याअभावी नागरिकांचे हाल, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा करवाडीच्या ग्रामस्थांचा इशारा

धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध), बेल्लूर (खु), जाफलापूर, चिंचोली, बेल्लूर (बु), आल्लूर, सिरजखोड, रामेश्वर, रामपूर, नेरली ह्या गावात गेल्या ७० वर्षांपासून लोकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. तसेच या गावांत जाणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच गावातील वयोवृद्ध, रुग्ण व गरोदर महिलांना उपचारासाठी धर्माबाद येथील रुग्णालयात आणण्यासाठी वाहनांमध्ये जीव मुठीत घेऊन यावे लागत आहे.

नांदेडमधील १० गावांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

गावातील नागरिकांनी मुलभूत सुविधेसाठी अनेक वर्षांपासून शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही. निवडणुकीत उमेदवारांनी अनेक विकासकामांची आश्वासने दिली आहेत. परंतु, निवडून आल्यानंतर जनतेला दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडत असल्याची खंत अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागातून निवडून आलेले आमदार व खासदार या गावांचा विकास व जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी असमर्थ ठरले असल्याची चर्चा आहे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता असल्यामुळे विकास होईल, अशी अपेक्षा जनतेची होती. परंतु, या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण निवडून आल्यामुळे शासन भरीव विकास निधी देत नसल्याची खंत काही काँगेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. या गावांचा विकास रखडला आहे. गावातील जनता मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे गावात जाण्यासाठी नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा -लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ : भाजपची विजयी घोडदौड विरोधक रोखणार का ?

त्यामुळे या गावातील लोकांची सहनशीलता आता संपली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. येथील तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. यावेळी वरील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला व पुरुष शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीमुळे प्रशासन हादरले असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांची चांगलीच फजिती होणार असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details