नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर जिल्हा हा गुन्ह्यांच्या बाबतीत मात्र क्राईम कॅपिटल म्हणून कु-प्रसिद्ध झाला आहे. अवघ्या सहा तासांत दोन खून झाल्याच्या घटना अगदी ताज्या असताना आता पुन्हा एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागूपर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील रिधोरा गावात राहणारा टॅक्सी चालक अंगद कडुकर याची निर्घृण हत्या झाली आहे.
हेही वाचा -नागपूरकरांनो लसीकरणासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम
अंगदचा खून तीन आरोपींनी संगनमत करून केला असल्याचा खुलासा झाला आहे. आरोपींनी सर्वात आधी अंगदला गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंगदला मृत समजून झाडा-झुडपात फेकून दिले, मात्र तरी देखील तो जिवंतच असल्याचे लक्षात येताच तिन्ही आरोपींनी मिळून गळा चिरून त्याचा खून केला. एवढ्यावर आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी क्रोर्याचा कळस गाठत अंगदला जिवंतच जाळले. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात काटोल पोलिसांना यश आले असून पोलिसांनी आरोपी अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी यांना अटक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अंगद कडुकर आणि आरोपींची कोणतीही ओळख नव्हती. फक्त मद्यपान करताना झालेल्या शाब्दिक वादातून हे क्रुर कृत्य केल्याचे आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केले.
हा संपूर्ण घटनाक्रम १३ मेच्या संध्याकाळी घडला आहे. अंगद कडुकर त्याच्या तीन मित्रांसह काटोलला जेवण करायला गेला होता. जेवणाआधी तिघे एका बंद असलेल्या झुणका भाकर केंद्रात मद्यपान करत असताना त्याच्या शेजारी आरोपी अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी हेही मद्यपान करत बसले होते. त्याच वेळी अंगदसोबत आलेले त्याचे दोन्ही मित्र काही काम आल्याने थोड्या वेळासाठी तिथून गेले असताना अंगदच्या शेजारी दारू पीत असलेल्या तिन्ही आरोपींसोबत शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी अंगदच्या टॅक्सीमध्येच त्याचे अपहरण केले आणि डोंगरगाव परिसरात नेऊन रस्त्यात अंगदला बेदम मारहाण केली.
अंगदला मृत झाल्याचे समजून फेकून दिले
बेशुद्ध झालेल्या अंगदला मृत समजून तिन्ही आरोपींनी त्याला सावळी शिवारात निर्जन ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर अंगदची टॅक्सी निर्जन स्थानी उभी करून तिन्ही आरोपी आपापल्या घरी परतले. मुख्य आरोपी अक्षय चिगेरिया ने दारूच्या नशेत मी एकाची हत्या केल्याचे त्याच्या पत्नीला सांगितले. अक्षयच्या घाबरलेल्या पत्नीने दोन कौटुंबिक मित्रांना बोलावून नवरा बोलत असलेली बाब तपासण्यासाठी त्यांना अक्षयसोबत सावळी शिवार पाठवले. अक्षय चिगेरियाने त्यांना अंगद कडुकरला मारून फेकल्याचे ठिकाण दाखविले. तिथे आरोपींनी मृत समजून फेकलेला अंगद तेव्हाही जिवंत होता आणि वेदनेने विव्हळत होता.