नागपूर - विरार येथील आगीच्या घटनेवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी 'अश्या घटना काही नॅशनल न्यूज नाही', असे वक्तव्य केले होते. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते कुठल्या मानसिकतेत म्हणाले हे मला माहित नाही. पण आपण संवेदनशील असले पाहिजे. या दुखद घटनांमध्ये अश्या प्रकारची प्रतिक्रिया देणे हे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.
मृतांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना -
विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यातील घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अगोदरच कोरोनामुळे वातावरण भयभीत झाले आहे. असे असताना सततच्या घटननेनंतर मुख्यमंत्री चौकशी करू, फायर ऑडिट करू, असे म्हणत असतात. मात्र, कारवाई होताना दिसत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. कोविडमुळे रुग्णालयांवर ताण वाढतो आहे. मात्र, रुग्णालयानेदेखील शासनाला मदत केली पाहिजे. भंडारा, ईशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या भयानक घटना आहे. अनकेजन मृत्यूमुखी पडले. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत, आता इतर रुग्णांची योग्य देखभाल करण्याकरिता योग्य पाऊल उचलले पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.