महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 5, 2019, 5:11 PM IST

Updated : Oct 5, 2019, 8:23 PM IST

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जाविरोधात काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला आहे.

आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर- देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जावरील प्रतिज्ञापत्राची नोटरीची मुदत २०१८ मध्येच संपलेली आहे. त्यांनी अर्ज दाखल करताना चुकीची माहिती दिली. त्यामुळे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी संबंधित पोलीस ठाण्यात फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थित सुनावणी चालू होती. मात्र, निवडणूक आयोगाने देशमुखांची मागणी फेटाळत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला आहे.

काय होता देशमुखांचा आरोप? -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जावरील नोटरीची मुदत २०१८ मध्येच संपली. त्यामुळे त्यांचा अर्ज नाकारण्यात यावा, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला होता. तसेच निवडणूक आयोगाचे अधिकारी फडणवीस यांच्या दबावाखाली आहेत. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील या सर्वांच्या मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे अधिकारी अंत्यत दबावाखाली आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करण्यात यावे, असे देखील देशमुख म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

विरोधकांनी वाघासमोर येऊन लढावे - भाजप

भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. विरोधकांनी वाघासमोर येऊन लढण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. विषय अतिशय किरकोळ असताना विरोधकांनी जाणीवपूर्वक या विषयाला मोठे करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांनी केला आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी ४ ऑक्टोबरला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

Last Updated : Oct 5, 2019, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details