नागपूर :आपल्या देशाला वैज्ञानिकांची गौरवशाली पंरपरा लाभली आहे. देशात विज्ञानाची ही परंपरा पुढे नेण्यात भारतीय विज्ञान काँग्रेसची भुमिका मोलाची ठरली आहे. आपण साऱ्यांनी ही गौरवशाली परंपरा पुढे नेऊ या, अशा शब्दात नोबेल पुरस्कार विजेत्या ॲडा योनाथ (Nobel Prize winner Ada Yonath) यांनी वैज्ञानिकांना साद घातली. (Ada Yonath speech). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजीत 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला. (Indian Science Congress in Nagpur). याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून ॲडा योनाथ बोलत होत्या. यावेळी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी,नागपूर विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, भारतीय विज्ञान काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अरविंद सक्सेना आदी उपस्थित होते.
भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख झाली :नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही 20 वर्षांपासून मी माझे संशोधन सातत्याने करीत आहे. संशोधकाने आपले संशोधन कधीही थांबवायचे नसते. या संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक डॉ. तनया बोस, डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांची मदत झाली. भारतीय वैज्ञानिकांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. माझे मार्गदर्शक डॉ. रामचंद्रन हे एक भारतीय वैज्ञानिक होते. त्यांच्याकडूनच मला महान भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख झाली. हीच महान व गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसने मोलाची भूमिका बजावली आहे. ही परंपरा आपण पुढे नेऊ या, असे आवाहन ॲडा योनाथ यांनी केले.
प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन :नागपुरातील आयोजनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विज्ञानाचा सेतू निर्माण केला. प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेस आयोजन झाले. त्यास सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरुन हे आयोजन यशस्वी झाले. 3 हजारांहून अधिक शोधनिबंध सादर झाले तर 50 हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. सर्वच दृष्टीने हे आयोजन यशस्वी झाल्याचे समाधान डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी व्यक्त केले.