महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 9, 2021, 12:25 PM IST

ETV Bharat / state

'भंडाऱ्यातील घटना प्रगतीशील महाराष्ट्राला काळिमा फासणारी'

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

नागपूर - आज (शनिवार) पहाटे भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या अतिदक्षता कक्षाला (SNCU) भीषण आग लागली. त्यामध्ये १० नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक आहे. आपल्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईवरून नागपूरला आल्यानंतर फडणवीस भंडाऱ्याला रवाना झाले.

भंडाऱ्यातील घटनेबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व आरोग्य व्यवस्था आद्ययावत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, भंडारा येथील घटनेने सर्व पोकळ दाव्यांची सत्यता उघड झाल्याची टीका फडणवीस यांनी केली. भंडारा येथील घटनेची उच्च स्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

फायर ऑडिट का झाले नाही?

या घटनेनंतर आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. रुग्णालयातील फायर सिस्टीमचे ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक महिती पुढे आली. या संदर्भात फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली आहे. कशामुळे फायर ऑडिट झाले नव्हते? यासाठी कोण दोषी आहे? याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.

पीडित कुटुंबांना १० लाखांची मदत द्या -

भंडारा जळीत घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. मात्र, शासनाने या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करून पीडितांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details