महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2023, 6:23 PM IST

Updated : May 1, 2023, 7:03 AM IST

ETV Bharat / state

Maharashtra Foundation Day History : मुंबई मिळवण्यासाठी केला होता मोठा संघर्ष; जाणून घ्या, महाराष्ट्र दिनाचा गौरवशाली इतिहास!

स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी जवळपास 5 वर्षे लढा दिला गेला. परिणामी मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत बॉम्बे राज्यातून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 रोजी लागू झाला. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

Maharashtra Day History
महाराष्ट्र दिनाचा इतिहास

मुंबई : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. याशिवाय या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उत्साहात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झाली होती.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती. स्वातंत्र्यानंतर शेकडो छोटी-छोटी राज्ये एकत्र करत राज्य व्यवस्था स्थापन करण्यात आली. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या. परंतु अनेक भाषा बोलणाऱ्या बॉम्बे राज्याच्या सीमा विसंगत होत्या. या राज्यात मराठी आणि गुजराती या दोन भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. या मतभेदांमुळे बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यासाठी चळवळ झाली. परिणामी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 रोजी लागू झाला. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 जणांचे बलिदान :संयुक्त महाराष्ट्रासाठी जवळपास 5 वर्षे विलक्षण लढा दिला गेला. या आंदोलनाचा प्रभाव सत्ताधारी पक्ष आणि राजकीय नेत्यांवर देखील पडला. या चळवळीत महिलांसह सर्वसामान्यांचा देखील मोठा सहभाग होता. ही चळवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली लढल्या गेली. यामध्ये कम्युनिस्ट पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी आणि कामगार पक्ष तसेच रिपब्लिकन पक्ष हे चार प्रमुख पक्ष होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यावेळी मोठे आक्रमक आंदोलन झाले. यावेळी सर्वत्र संचारबंदीचे आदेश होते. पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता. 16 ते 22 जानेवारी या कालावधीत 90 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे एकूण 106 जणांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले. तसेच यावेळी सुमारे 10,000 सत्याग्रहींना देखील अटक करण्यात आली होती.

मुंबईसाठी दोन राज्यांमध्ये संघर्ष : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये मुंबई (तत्कालीन बॉम्बे) शहरावरून मोठा वाद झाला होता. बॉम्बेला महाराष्ट्रात सामील करावे असे मराठी लोकांचे मत होते, कारण येथील बहुतेक लोक मराठी बोलत. 1956 मध्ये बॉम्बे या द्विभाषिक राज्यातून वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी सुरु झाली. त्याच वर्षी गुजरात भाषिकांसाठीच्या वेगळ्या राज्यासाठी महागुजरात चळवळ सुरु झाली होती. त्यांनीही मुंबईला गुजरात मध्ये सामिल करण्याची मागणी केली. त्यासाठी प्रभावशाली आणि शक्तिशाली गुजराती उद्योगपतींनी मुंबईच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. मोरारजी देसाई यांनी मुंबईचा एकतर गुजरातमध्ये समावेश करावा किंवा मुंबई केंद्रशासित प्रदेश बनवावे, अशी भूमिका घेतली.

लढाई रस्त्यावर पसरली :मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त होती. त्यामुळे ती महाराष्ट्रातच जाईल, अशी शक्यता होती. तसेच मुंबईच्या आसपासचा प्रदेश हा मराठी भाषिक होता, जो महाराष्ट्रात सामिल होणार होता. त्यामुळे मुंबईवरील महाराष्ट्राच्या दाव्याला बळ मिळाले. मात्र गुजरातींनीही येथील विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुतवणूक केली होती. 15 जानेवारी 1956 रोजी नेहरूंनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यानंतर आंदोलक लगेच रस्त्यावर आले. रात्रशाळेतील विद्यार्थी बंडू गोखले पोलिसांच्या गोळीला बळी पडले. आंदोलनाचे नेते कॉम्रेड एस.ए.डांगे आणि सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. 16 जानेवारी 1956 ते 22 जानेवारी 1956 युनियन नेत्यांनी बॉम्बे बंदची हाक दिली. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी पुन्हा एकदा आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, ज्यात 90 लोक मरण पावले आणि 400 हून अधिक जखमी झाले. आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि तत्कालीन अर्थमंत्री सीडी देशमुख यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्तावावरून राजीनामा दिला.

अखेर चळवळीला यश :अथक परिश्रमानंतर 1 मे 1960 रोजी सध्याचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आपले उद्दिष्ट साध्य केले. मात्र राज्य पुनर्रचनेमुळे उत्तर कर्नाटकातील बेळगाव, कारवार यांसारखे मराठी भाषिक भाग कर्नाटकात सामिल झाले. डांग जिल्ह्यातील 200 हून अधिक मराठी भाषिक गावांच्या मागण्या फेटाळण्यात आल्या. परंतु तरीही मुंबई महाराष्ट्रात सामिल झाल्याचा आनंद साजरा केला गेला. पाच वर्षे चाललेल्या या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या भावी राजकारण्यांना राजकारणासाठी 'मराठी अस्मिता' हा देखील मिळाल.

महाराष्ट्र नावाचा इतिहास :दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील उंच प्रदेशाला सूचित करणारे महाराष्ट्र हे नाव प्रथम 7 व्या शतकात आढळून आले. एका व्याख्येनुसार, हे नाव महारथी (महान रथ चालक) या शब्दावरून आले आहे, ज्याचा संदर्भ उत्तरेकडील कुशल लढाऊ समाजाशी आहे ज्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले. या समाजाची भाषा पूर्वीच्या नागा स्थायिकांच्या भाषेत मिसळली आणि ती महाराष्ट्री बनली, जी 8 व्या शतकात मराठीत विकसित झाली. त्या सुरुवातीच्या काळात सध्याचे महाराष्ट्र राज्य सातवाहन, वाकाटक, कलाकुरी, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव अशा विविध हिंदू राज्यांमध्ये विभागले होते.

हेही वाचा :Vikhe Patil On Maan ki Baat : पंतप्रधान मोदी देशाच्या इतिहासात जनतेशी थेट संवाद साधणारे एकमेव नेते - विखे पाटील

Last Updated : May 1, 2023, 7:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details