महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रणधुमाळी विधानसभेची : मोदी आणि शाहांचे टार्गेट पवारचं का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना नेते जिथे जातील तिथे फक्त शरद पवारांवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राज्यातील पहिल्या सभेपासून त्यांनी पवारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाला पवारांची खरोखर भिती का वाटते का? की पवारांना लक्ष्य केले तरच जनतेमध्ये आणि माध्यमात चर्चेत राहाता येते? की, पवारांवर टीका करण्याचे यापेक्षा काही वेगळे कारण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

By

Published : Oct 17, 2019, 7:11 PM IST

शरद पवार, नरेंद्र मोदी


मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना नेते जिथे जातील तिथे फक्त शरद पवारांवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राज्यातील पहिल्या सभेपासून त्यांनी पवारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाला पवारांची खरोखर भिती का वाटते का? की पवारांना लक्ष्य केले तरच जनतेमध्ये आणि माध्यमात चर्चेत राहाता येते? की, पवारांवर टीका करण्याचे यापेक्षा काही वेगळे कारण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

मोदी-शहांच्या राज्यात ३० सभा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रतिष्ठेची केली आहे. महाराष्ट्र स्थापनेनंतर राज्यात प्रथमच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ही सत्ता कायम टिकवून ठेवण्याचे देवेंद्र फडणवीसांसोबतच पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर आव्हान आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठं राज्य ही भाजपकडे महाराष्ट्राची ओळख आहे. देशाची आर्थिक राजधानीही याच राज्यात, यामुळे असे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे राज्य आपल्या ताब्यात राहावे यासाठी भाजप लोकसभेपासूनच कामाला लागली आहे.


राज्यात मोदींच्या १० तर अमित शाह यांच्या २० सभा आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाहची मुंबईत सभा झाली होती. त्याआधी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप मोदींच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झाला. भाजपच्या या शिर्ष नेत्यांच्या भाषणात सर्वात ठळक उल्लेख होता तो राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांचा.

भाजप सत्तेत येण्यापूर्वी १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. या १५ वर्षात शरद पवारांनी काय केले? असा दोन्ही नेत्यांच्या भाषणाचा रोख होता. त्यानंतरच्या आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सभेत मोदी-शाह जोडीचे भाषण पवारांवर टीका केल्याशिवाय पूर्ण झालेले नाही. १९ तारखेच्या सायंकाळपर्यंत जाहीर सभा होणार आहेत. तोपर्यंत ही टीकेची धार अधिकाधिक धारदार होत जाणार यात शंका नाही. मात्र, प्रश्न हा आहे की, पवार व्यक्तीशः गेल्या १५ वर्षांत राज्याच्या सत्तेत नव्हते. मागील पाच-सहा वर्षांपासून ते केंद्रातही सत्तेत नाहीत, असे असताना मोदी-शाहंच्या रडारवर पवारच का आहेत?

महाराष्ट्रातील शेती, उद्योग, सहकार चळवळ, शिक्षण संस्था, आर्थिक आणि क्रीडा संघटना या सर्वांची शरद पवार यांना माहिती आहे. या सर्वच क्षेत्रांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्यांचा संबंध राहिलेला आहे. मराठवाड्यातील प्रश्न काय आहेत, विदर्भामध्ये कोणत्या उद्योगांची आवश्यकता आहे, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे खाचखळगे तळहातावरील रेषांप्रमाणे त्यांना माहित आहेत. उत्तर महाराष्ट्रातील शेती आणि कांदा, केळी उत्पादकांच्या समस्या काय आहेत, या संबंधीचाही त्यांचा अभ्यास आहे. यूपीए सरकारच्या दोन्ही कार्यकाळात देशाचे कृषिमंत्रीपद त्यांच्याकडे होते, त्यामुळे या प्रश्नांशी त्यांचा जवळून संबंध आलेला आहे. अशी महाराष्ट्राची नस ओळखणारे नेते म्हणून शरद पवार ओळखले जातात.

पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा सहकार चळवळीतून झाला आहे. या सहकार चळवळीवरही पवारांची पकड राहिली आहे. काँग्रेसकडे सध्या असे अष्टपैलू नेतृत्व नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राज्याचे नेतृत्व केलेले असले आणि तेही आता निवडणूक लढवत असले तरी विरोधकांना पवारांवरील हल्ला अधिक फायदा देणारा राहाणारा आहे. त्यामुळे सहाजीकच त्यांच्या टिकेचा रोख हा पवारांवर राहात आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या वर्चास्वाचा विचार केल्यास विदर्भामध्ये भाजपला टक्कर देईल अशी स्थिती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नाही. मराठवाड्यातही या दोन्ही पक्षांनी पूर्ण प्रवेश केलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात आधी खडसे आणि आता महाजनांमुळे पक्ष मजबूत स्थितीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र भाजपला अजून पूर्ण मान्यता मिळालेली नाही. येथील सहकार लॉबी आणि मराठा समाज यांना पवारांपासून दूर करणे हे भाजपसमोरचे आव्हान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ७२ जागाच फक्त भाजपचे लक्ष्य नाही, तर येथील पवारांचा प्रभाव कमी करणे यासाठी पवार आणि राष्ट्रवादीला भाजपकडून लक्ष्य केले जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पश्चिम महाराष्ट्रावरील पवारांची पकड ढिली करणे

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील अहमदनगर असे एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या सहाही जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँका, सूतगिरणी असे सहकाराचे जाळे पसरलेले आहे. या सहकार चळवळीवर काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकहाती सत्ता राहिलेली आहे. यामध्ये भाजप आणि सेनेला शिरण्याची संधी फार कमी मिळाली आहे. मात्र २०१९-लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि त्यानंतरही भाजपने या सहकारपट्ट्यातील नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात नगरमधील राधाकृष्ण विखे, सोलापूरातील मोहिते पाटील हे आता भाजपवासी झाले आहेत. श्रीगोंद्यातील बबनराव पाचपूते २०१४मध्येच सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले होते. अकोले येथील मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत होते, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांचा मुलगा वैभव आता कमळ हाती घेऊन मतदान मागत आहे.

कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडले असून ते आता कुटुंबीयांसोबत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यासोबतच शिवेंद्रराजे यांनीही भाजप प्रवेश केला. वाईमधून माजी आमदार मदन भोसले यांनी भाजप प्रवेश केला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सोडून जाणारे हे सर्व नेते आपापल्या मतदारसंघातील संस्थानिक आहेत. यांच्यामाध्यमातून आता भाजप सहकारामध्ये डोकावणार आहे. सहकार क्षेत्रातील पवारांची सद्दी संपवणे आणि सहकाराच्या माध्यमातून या क्षेत्रातील समान्यांपर्यंत भाजप पोहोचवणे, यासाठी भाजपचा अटापिटा चालेला दिसत आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होणार का, हे येत्या २४ ऑक्टोबरला समोर येईलच.

ABOUT THE AUTHOR

...view details