मुंबई :क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दोन महिन्यांपूर्वी ट्विटर सोशल मीडिया माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण केले गेले होते. याबाबत विरोधकांनी असे लिखाण करणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत आंदोलन देखील करण्यात आले होते. आज या विषयावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे गट आक्रमक झाले. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केले.
राजीनामा द्या- यशोमती ठाकूर :क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या ट्विटर हँडलवर कारवाई केली गेली नाही. असे करणाऱ्याला अजून ताब्यात का घेतले गेले नाही? असा प्रश्न आम्ही विचारला. तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. हे सरकार सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिहिलेल्याला अटक करू शकत नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा संताप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
नोटीस कोणाला दिली-जितेंद्र आव्हाड :क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्याबद्दल 'इंडिक टेल' यावर हे आक्षेपार्ह लिखाण केले गेले. आम्ही कारवाईबाबत आंदोलनेदेखील केली. आता दोन महिने झाले तरी त्यावर कारवाई केली गेली नाही आणि अटक नाही. त्यामुळे नेमके सुरू काय? आम्हाला सभागृहात समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. महामानवाचा अपमान ही एक खंत आहे. सरकारकडून उत्तर दिले जाते की, 141-अ ची नोटीस दिली आहे. पण, ही नोटीस कोणाला दिली हे सांगावे. नाहीतर महाराष्ट्राची माफी मागावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केले आहे.