मुंबई :आज दिवसभराच्या उसंतीनंतर सायंकाळी पुन्हा एकदा मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारची संध्याकाळ ते सोमवारी दुपारपर्यंत उपनगरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यांनतर आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे 24 तास मुंबई ठाण्यासह, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाच्या मुंबई विभागाने दिला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, पावसाचा जोर कायम राहणार आहे.
ऑरेंज अलर्ट केला जारी :हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरात या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, परभणी, हिंगोली येथे बुधवारपर्यंत एक-दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर नांदेड, लातूर जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. शुक्रवारपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी भंडारा, बुधवारी चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली, गुरुवारी गोंदियामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.