मुंबई -केंद्र सरकारने देशात 20 लाख कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केलेली असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत. त्यांना केंद्राच्या पॅकेजवर विश्वास नाही का?, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यातील विविध घटकांसाठी राज्यानेही पॅकेज देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. त्यावर पाटील यांनी पाहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते.
विरोधकांनी संयमाने राज्यातील स्तिथीचा आढावा घेऊन सरकारसोबत या संकट काळात उतरले पाहिजे. मात्र, विरोधक याचेही राजकारण करत असल्याचे पाटील म्हणाले. वारंवार राज्यपालांना भेटून तक्रारी करण्यापेक्षा विरोधकांनी सरकारशी संवाद ठेवायला हवा असेही त्यांनी सांगितले. दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना आमची विनंती आहे की, आमच्याशी बोला, आम्हाला व्यवस्था आणखी सुधारायला सूचना द्या. सतत राज्यपालांना भेटून त्रास देणे योग्य नाही. अशाप्रकारे व्यवस्थेचे खच्चीकरण करणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.