महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsena-VBA Alliance : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचा आंबेडकरांचा पंगा ठाकरे गटाला ठरतोय डोकेदुखी - Displeasure from Congress

शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र आल्याची प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. प्रकाश आंबेडकर आघाडीचा भाग असतील, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मात्र, आठवड्याभरातच कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचितबाबत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रस्तावच मिळाला नसल्याचा दावा केला.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Jan 31, 2023, 10:03 PM IST

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरील टीकेमुळे काँग्रेस दुखावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आंबेडकर यांनी घेतलेला पंगा आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला टक्कर देताना, वंचितसह महाविकास आघाडी अभेद्य राखताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला दूर करत अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती : शिवसेना, भाजप यांच्यात सत्तेवरुन दुरावा आला होता. त्यामुळे ठाकरेंनी भाजपला नमवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली होती. अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी सहा महिन्यापूर्वी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली असून दिवसागणिक ठाकरेंच्या सेनेत इनकमिंग आऊटगोइंग सुरू आहे. मात्र, सेनेतील फुटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. आता वंचित आघाडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली आहे.


शिवसेनेला आघाडी शिवाय पर्याय नाही :शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारीला युतीची घोषणा केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या नव्या युतीने राज्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार झाले. युतीची घोषणा करताना उध्दव ठाकरे यांनी वंचितच्या युतीबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे स्पष्ट केले होते. भाजपला राज्यात रोखायचे झाल्यास शिवसेनेला वंचितसह महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. मात्र, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित एकत्र आलेले अद्याप रुचलेले दिसत नाही.


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यातील पूर्वीच्या राजकीय मतभेद सर्वश्रुत आहे. तर काँग्रेसवर आंबेडकर यांनी केलेली टीका अद्याप विसरलेली नाही. हा अंतर्गत वाद आजही कायम आहे. शिवसेनेशी युती करताना देखील प्रकाश आंबेडकर यांनी आमची युती ठाकरेंसोबत आहे. महाविकास आघाडीचे आम्हाला काही देणेघेणे नाही, अशी परखड भुमिका आंबेडकर यांनी मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी वंचितबाबत बोलताना, या भानगडीत पडत नाही. ठाकरेंकडून प्रस्ताव आल्यानंतर विचार करू, अशी प्रतिक्रिया दिली होती. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची आंबेडकर यांनी उडवलेल्या टिंगलमुळे कॉंग्रसमध्ये मोठी नाराजी आहे.



आघाडीची घडी बसणार का.?येत्या काळात मुंबई मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकजूट असणे आवश्यक आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील सततच्या वादग्रस्त विधानांमुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद मिटवून आघाडी एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मध्यस्थीची भूमिका बजवावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे कशा प्रकारे आघाडीची घडी बसवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -State Cabinet Decisions : 'जय जय महाराष्ट्र माझा'ला राज्य गीताचा दर्जा, वाचा मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details