महाराष्ट्र

maharashtra

'मातोश्री' ते 'वर्षा' ; ठाकरेंचा किंगमेकर ते किंगपर्यंतचा प्रवास

By

Published : Nov 26, 2019, 11:51 PM IST

३० वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती. मधल्या काळात ही युती तुटून पुन्हा जुळली. गेल्या पाच वर्षात शिवसेना भाजपमागे फरफटत जाताना दिसली. पण, २०१९च्या निवडणुक निकालानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आणि आता उद्धव ठाकरे राज्याच्या सत्ता सिंहासनावर आरुढ होत आहेत.

mumbai
उद्धव ठाकरे

मुंबई - मी सत्तेच्या सिंहासनावर बसणार नाही अशी प्रतिज्ञा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. पण, त्यांचेच पुत्र उद्धव महाराष्ट्राच्या सत्तेवर आरुढ होण्यास निघाले आहेत. नव्याने गठीत झालेल्या महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रपदाचा उमेदवार घोषीत केले आहे. दहा वर्षांपूर्वी उद्धव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. आज तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.

उद्धव बाळ ठाकरे
जन्म - २७ जुलै १९६०
शिक्षण - सर जे. जे. आर्ट्स स्कूल

फोटोग्राफर उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. राजकारणात येण्याआधी एक गुणवान व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी नाव कमावले होते. उद्धव यांच्याकडे ही व्यंगचित्रकलेची कला तर आली नाही. पण, फोटोग्राफीचा त्यांना छंद आहे. ते उत्तम फोटोग्राफी करतात. महाराष्ट्र देश आणि पाहावा विठ्ठल ही फोटोग्राफीवरील त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या जिद्दीची कहाणी
उद्धव ठाकरे यांच्या चिकाटी आणि जिद्दीविषयी एक किस्सा सांगितला जातो. राज ठाकरे हे बॅडमिंटन खेळण्यात मोठे वाकबगार होते. एकदा त्यांनी आणि काही मित्रांनी उद्धवना खेळण्यासाठी बोलावले. उद्धवना बॅडमिंटन खेळण्यात स्वारस्य नव्हते. पण , ते आले. खेळता खेळता उद्धव पडले. तेव्हा सर्व मित्र त्यांना हसले. त्यानंतर उद्धव कधी खेळायला आले नाहीत.
सर्वांना वाटले की उद्धवना त्यांचा अपमान झाला असे वाटले असेल म्हणून ते आले नसावेत. पण, प्रकार काही वेगळाच होता. ज्या प्रशिक्षकाकडून राज प्रशिक्षण घेत असत त्यांच्याचकडून उद्धवनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि काही दिवसातच त्यांनी बॅडमिंटन खेळण्यात प्राविण्या मिळवले.

उद्धव ठाकरेंचा राजकारण प्रवेश
गोष्ट आहे १९९१ सालची. विदर्भात एके ठिकाणी एक बेरोजगारांचे एक आंदोलन होते. ज्याचे नेतृत्व विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज ठाकरे करणार होते. पण, ऐनवेळी त्यांना सांगण्यात आले की उद्धव ठाकरे देखील तिथे भाषण करतील. राज या प्रकारामुळे बरेच चिडले होते असे सांगण्यात येते. पण, हा उद्धव यांचा राजकारणातील चंचुप्रवेश होता.

महाबळेश्वर येथील अधिवेशन
२००३ ला महाबळेश्वर येथे शिवसेनेचे अधिवेशन होते. हे अधिवेशन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारे ठरले. त्या आधी उद्धव पक्षात बऱ्यापैकी सक्रिय झाले होते. या अधिवेशनात त्यांना कार्यध्यक्षपदी नेमण्यात यावे असा ठराव राज ठाकरेंनी मांडला आणि तो सर्वानुमते संमत करण्यात आला. इथूनच उद्धव यांचे शिवसेनेतील स्थान प्रबळ झाले.

२००९ चे मनसेचे आव्हान
शिवसेनेतील सत्तासंघर्षात उद्धव यांनी बाजी मारली. नाराज होऊन राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे मनसेचे आव्हान होते. शिवसेनेच्या अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. पण, तरीही या आव्हानापासून रक्षण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. फारशी हानी न होऊ देता त्यांनी शिवसेना शाबूत ठेवली.

२०१४ नंतरची शिवसेना
मोदींच्या प्रचंड लाटेमध्ये शिवसेनेने आपला गड राखला. पण, राज्य सरकारमध्ये तिला मानहानी स्वीकारावी लागली. पाच वर्षे सत्तेत असूनही शिवसेना विरोधाच्या भूमिकेतच राहिली. पण, २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपला खिंडीत गाठत सत्तेचे शिखर गाठण्याचा प्रयत्न केला. आणि आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ते सिंहासनावर विराजमान होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details