मुंबई - राजधानी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ १८७९ साली ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा सर्वात लहान तलाव आहे. हा तलाव बुधवारी दुपारी ओसंडून वाहू लागला आहे.
मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी 3750 दशलक्ष अर्थात 375 कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो, तर तुळशी आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो. तुळशी तलावातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर म्हणजेच १.८ कोटी लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर म्हणजेच सुमारे २२ मैल अंतरावर हा तलाव नॅशनल पार्क येथे आहे.
तुळशी कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर म्हणजेच ८०४६ दशलक्ष लीटर इतका असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.
तुळशी ओव्हरफ्लो -
गेल्या काही दिवसांत तुळशी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव काल २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्यावर्षी दिनांक १२ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०१८ मध्ये दिनांक ९ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्ये दिनांक १४ ऑगस्ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.