महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; राज्यातील १४ मतदारसंघात लढत

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रकिया आज पार पडणार आहे. राज्यातील १४ मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, राजू शेट्टी, सुजय विखे पाटील, निलेश राणे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

By

Published : Apr 22, 2019, 3:13 PM IST

Updated : Apr 23, 2019, 6:25 AM IST

तिसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रकिया आज पार पडणार आहे. राज्यातील १४ मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यातील प्रमुख लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि जालना या मतदारसंघातील लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बारामती -

बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकील्ला समजला जातो. मात्र, यावेळी या बालेकील्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. कांचन कुल यांच्या विजयासाठी भाजपच्या नेत्यांनी चांगलीच ताकद पणाला लावली आहे.

अहमदनगर -

नगर दक्षिण मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजमध्ये प्रवेश करत लोकसभेचे तिकीट मिळवले आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शरद पवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे तर राधाकृष्ण विखेंनी पुत्र सुजयसाठी फिल्डिंग लावली आहे.

माढा -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघ हा जोरदार चर्चेत आला होता. सुरुवातील येथून शरद पवार निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी येथून माघार घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी देत विजयसिंह मोहिते पाटलांना धक्का दिला. तर भाजपने येथून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी दिली आहे. मोहिते पाटलांनी आपली संपूर्ण ताकद निंबाळकरांच्या पाठीशी उभी केल्याने मोहिते विरुद्ध पवार असा संघर्ष समोर आला आहे.

सांगली -

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला. मात्र, यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे. येथून भाजपने संजयकाका पाटील यांना पुन्हा तर आघाडीतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे मैदानात उतरलेत. तर वंचित बहुजन आगाडीकडून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवत असल्याने रंगत निर्माण झाली आहे.

औरंगाबाद -

या मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. दरवेळेस शिवसेनेला एकतर्फी वाटणारी निवडणूक यावेळी तुल्यबळ मानली जातेय. येथून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकात खैरे पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने सुभाष झांबड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर वंचित आघाडीकडून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील तर शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून हर्षवर्धन जाधव हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे येथून कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग -

या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे हे तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात राणे विरुद्ध शिवसेना असा छत्तीसचा आकडा आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांनी हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.

कोल्हापूर -

या मतदारसंघात शिवसेनेसह राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून राष्ट्रवादीने दुसऱ्यांदा धनंजय महाडीक यांना तर शिनसेनेने संजय मंडलीक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. धनंजय महाडिक यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी तर संजय मंडलिक यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.


जालना -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विलास औताडे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या लढतीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात उमेदवारूवरुन वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर खोतकरांनी माघात घेत दानवेंच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

Last Updated : Apr 23, 2019, 6:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details