महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 19, 2021, 3:49 PM IST

ETV Bharat / state

म्यूकरमायकोसिस रूग्णांवर होणार मोफत उपचार, राज्य सरकारने कंबर कसली

म्यूकरमायकोसिसने राज्यात तोंड वर काढले आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत या आजाराने 10 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्यात या आजारावर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. तसेच औषधांचा काळाबाजारही रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लावली आहे.

मुंबई
mumbai

मुंबई - वाढत्या म्यूकरमायकोसिसच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. मोफत औषधोपचार, तसेच औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे म्यूकरमायकोसिसचा सामना करणे आरोग्य यंत्रणेला शक्य होईल, असा दावा राज्य शासनाने केला आहे.

म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यूंचे प्रमाण अधिक

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्या यामध्ये म्यूकरमायकोसिस या नव्या आजाराची भर पडली आहे. महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या राज्य शासनाची डोकेदुखी ठरु लागली आहे. सध्या या आजाराचे सुमारे दोन ते अडीच हजारांच्या आसपास रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्य शासनाने यासाठी स्पेशल म्यूकर वॉर्ड आणि ऑपरेशन थियटर सुरु केले आहेत. सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे भागात आढळून आले आहेत. म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यूंचे प्रमाणही अधिक असल्याची भीती वर्तवली जात आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार

राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 'म्यूकरमायकोसिससाठी विशेष तज्ज्ञांची आवश्यकता आहे. तसेच या आजारावरील औषधोपचाराचा खर्च जास्त आहे. सर्वसामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. त्यामुळे राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या आजारावर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ सर्जीकल पॅकेज आणि ८ मेडिकल पॅकेज यासाठी कार्यन्वित असतील. तसेच संबंधित रुग्णाने विमा संरक्षण योजनेतून उपचार घेतल्यास आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्त्वावर खर्च भागवला जाणार आहे. यामुळे संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होणार आहे', असे राज्य शासनाने म्हटले आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी कठोर नियमावली

म्यूकरमायकोसिस आजारावर अँटीफंगल औषध महत्वाचा भाग आहे. मात्र, औषधे महागडी असून त्यांचा पुरवठाही कमी प्रमाणात होत आहे. यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेत राज्य शासनाने कठोर नियमावली तयार केली आहे. यात जिल्हा शल्य चिकित्सकांवर औषधांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपावली आहे. त्यांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार औषधे उपलब्ध करुन द्यावीत. तसेच औषधांचा संपूर्ण ताळेबंद तपासावा. रुग्णांवर आर्थिक भार पडणार नाही याची खात्री करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांवर उपचार करुन म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल, असा शासनाचा दावा आहे.

म्यूकरमायकोसिस मृत्यूचे आकडे

राज्य सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, म्यूकरमायकोसिसची बाधा झाल्याने आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, नागपूरात २६, औरंगाबाद २४, नाशिक ३ तर मुंबईत एका रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दोन्ही आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.

म्यूकरमायकोसिसची अशी आहेत लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे.

हेही वाचा -आयएनएस कोचीकडून 185 जणांना वाचवण्यात यश, 34 मृतदेह सापडले

ABOUT THE AUTHOR

...view details