महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक येथील दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न, घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Nashik oxygen tank leak CM reaction

नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल. शिवाय, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 21, 2021, 4:41 PM IST

मुंबई - नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल. शिवाय, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा -"ही शेवटची सकाळ असेल...", क्षय रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. मनीषा जाधव यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेड नाहीत. त्या अभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच, एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल. शिवाय, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले.

निष्पाप जीव जाणे मनाला टोचणारे

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे, हे शिकवणारी आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये, आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.

ऑक्सिजन मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर करा

कोरोनाच्या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे, हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करत आहोत. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सूचना दिल्या आहेत. असे असताना हे कसे घडले, ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी, असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणतात. तसेच, यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा, तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा -शरद पवारांवर तिसरी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details