मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भावामुळे गेले काही महिने नाट्यगृह, मल्टीप्लेक्स, करमणूक केंद्र बंद होती. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या क्षेत्राना प्रत्येक शोमागे ६० रुपयांवर एक हजार रुपये कर मोजणे अडचणीचे ठरणार आहे, असे सांगत स्थायी समितीने प्रशासनाच्या करवाढ प्रस्तावाला विरोध दर्शवत प्रशासनाकडे परत पाठवला होता. आता हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आल्याने शुल्कवाढ टळली आहे.
प्रस्ताव परत पाठवला -
मुंबईत मल्टीप्लेक्सच्या प्रत्येक शोसाठी केवळ ६० रुपये आकारले जात आहेत. सिनेक्षेत्रात एकाच इमारतीत अनेक पडदे असतात. येथे एकाच वेळी सिनेमांचे अनेक शो चालतात. मल्टिप्लेक्सच्या कारभाराच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपूंजी आहे. तर सिनेमागृहांमध्ये तिकीट हे २०० रुपयांपासून १५५० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी १ हजार रुपये करवाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. सध्या करवाढ न करता प्रस्ताव परत पाठवावा, अशी सूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत मांडली. विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी सुचनेला अनुमोदन दिले. तसेच सर्वपक्षीय सदस्यांनी याला पाठिंबा दिला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे तूर्तास तरी करमणूक करात होणारी वाढ टळली आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करून प्रशासनाने सुचवलेली दरवाढ लागू करायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार होता. आता हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आल्याने शुल्कवाढ टळली आहे.