मुंबई- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. यामध्ये बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यात आला आहे. काही अटीसह बांधकामे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात हा दिलासा बांधकाम क्षेत्रासाठी दिलासा ठरताना दिसत नाही. कारण लॉकडाऊनच्या भीतीने लाखो मजूर गावी गेले आहे. त्याचवेळी काही मजूर कोरोनाच्या भीतीने तर काही मजूर नियमानुसार लसीकरण न झाल्याने कामावर येत नाहीत. परिणामी बांधकामे आणि मालमत्ता व्यवहार 50 टक्के सुरू असून संचारबंदीचा मोठा फटका या क्षेत्राला बसत असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
वर्षभर मंदीचे सावट
गेल्या वर्षभरात घर विक्री-खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यातून राज्य सरकारला चांगला महसूलही मिळाला आहे. पण, प्रत्यक्षात मागील वर्षभरात नवीन प्रकल्प म्हणावे तसे सुरू झालेले नाहीत की प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या भीतीने बांधकाम मजूर मोठ्या संख्येने अगदी 70 टक्के मजूर आपल्या मूळ गावी गेले. लॉकडाऊनमध्ये दोन महिने काम बंद आणि जेव्हा जूनमध्ये बांधकामाला परवानगी मिळाली तेव्हा मजुरच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत या क्षेत्राला लॉकडाऊनच्या दुष्परिणामांची झळ सहन करावी लागली. दिवाळीनंतर हळूहळू मजूर परत मुंबई, राज्यात येऊ लागले. कामाने गती घेतली. आता 'अच्छे दिन' येतील असे वाटत असताना मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून आता पुन्हा लॉकडाऊन झाले आहे. पुन्हा मार्च 2020 सारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. एकूणच हे क्षेत्र मागील वर्षभर मंदीची झळ सोसत आहे, अशी प्रतिक्रिया बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी आंनद गुप्ता यांनी दिली आहे.