मुंबई - महानगरपालिकेने मुंबईत ठिकठिकाणी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पावसाळ्यात पाणी शिरून त्याचा रुग्णांना त्रास होणार आहे. ही केंद्र कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठीच बनवली असल्याचा आरोप भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. अशी सेंटर उभारण्यापेक्षा पालिकेने रिक्त इमारती ताब्यात घेऊन कोविड सेंटर उभारावीत, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णालये अपुरी पडत आहेत. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने वरळी, गोरेगाव, बिकेसी(वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे कोविड केअर सेंटर उभारली आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चक्रीवादळ येणार, असा इशारा मिळाल्याने बिकेसी येथील कोरोना सेंटर बंद करण्यात आले. तेथील रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. या प्रकारामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
बिकेसीमध्ये ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे त्याच्या बाजूलाच मिठी नदी वाहते. याच मिठी नदीने 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत हाहाकार माजवला होता. मुंबईत पावसाळ्यात दर दिवशी 8 ते 10 इंच पाऊस रोज पडतो. अशा परिस्थितीत पालिका रुग्णांची कशा प्रकारे व्यवस्था करणार आहे, याची माहिती जाहीर करावी. महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे तशी मागणी केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.