महाराष्ट्र

maharashtra

'धनगर समाज कुणाच्या बापाची जहागिरी नाही’; भाई जगतापांच्या विधानावरून विधान परिषदेत गदरोळ

By

Published : Jun 27, 2019, 4:35 PM IST

'धनगर समाज हा कुणाच्या बापाची जाहगीर नाही' असे विधान काँग्रेसचे भाई जगताप यांनी केल्याने विधानपरिषदेत आज जोरदार गदारोळ झाला होता. त्यानंतर सभागृहाचे कामकाज अल्पकालीन चर्चेदरम्यान सुरूवातीला दहा मिनिटांसाठी दोन वेळा आणि शेवटी एक तासासाठी असे तीन वेळा तहकूब करण्यात आले.

भाई जगताप यांचे छायाचित्र

मुंबई- 'धनगर समाज हा कुणाच्या बापाची जहागिरी नाही' असे विधान काँग्रेसचे भाई जगताप यांनी केल्याने विधानपरिषदेत आज जोरदार गदारोळ झाला होता. विरोधकांनी भाई जगताप यांचे हे विधान कामकाजातून काढून घेण्याची आणि त्यानंतर थेट सभागृहात माफी मागण्याचीच मागणी केली होती. त्यानंतर सभागृहाचे कामकाज अल्पकालीन चर्चेदरम्यान सुरुवातीला दहा मिनिटांसाठी दोन वेळा आणि शेवटी एक तासासाठी असे तीन वेळा तहकूब करण्यात आले.


त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतरही सत्ताधारी पक्षांनी पुन्हा तोच मुद्दा लावून धरला. त्यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अर्ध्या तासासाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी परिषदेचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.


काँग्रेसचे रामहरी रुपनवर, भाई जगताप, आदींनी राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर रुपनवर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गेल्या ५ वर्षात सरकारने निर्णय घेतला नाही. केवळ चालढकलपणा केला. त्यातच समाजाचे दुर्लक्ष व्हावे, म्हणून या समाजाच्या आरक्षणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला अहवाल तयार करण्याचे काम दिले. मात्र, तो अहवाल आल्यानंतर त्यात नेमके काय आहे, हे सभागृहात मांडणे आवश्यक असताना तो अहवाल सरकारे आता अॅटर्नी जनरलकडे दिला. याचाच अर्थ या सरकारला राज्यातील धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नसल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ केला.


विरोधकांनी सरकारविरोधात ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. त्याचबरोबर, भाई जगताप यांनी केलेल्या विधानावर सत्ताधाऱ्यांनी त्यांचे शब्द हे असंसदीय असून ते कामकाजातून काढून टाकण्याची मागणी लावून धरली. प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर भाजपचे प्रसाद लाड यांनी भाई जगताप यांचा माफीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावर सभापतींनी भाई जगताप ज्येष्ठ सदस्य असल्याने ते काय बोलले हे तपासून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.


सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाच्या चर्चेवर फार बोलू दिले नाहीत, परंतु माझा निर्णय मी त्यानंतर देईल असे भाई जगताप यांनी स्पष्ट केल्यानंतरही सत्ताधाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर भाजपचे गिरीष व्यास यांनी तालिका सभापतींना भाई जगताप यांचे वक्तव्य तपासून घेतो म्हणून सांगितले. यानंतर दोनदा सभागृह तहकूब झाले. त्यानंतर सभापतींनी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना पुण्यातील बालेवाडी येथील शिवप्र‍िय रियालिटी जमीन प्रकरणासाठी उपस्थित करण्यात आलेल्या २८९ वरील स्थगन प्रस्ताव पुकारला व त्यांना बोलण्यास परवानगी दिली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सभागृहात जोरदार गदारोळ सुरू केल्याने सभापतींनी कार्यक्रम पत्रिकेतील कामकाज पुढे ढकलत परिषद दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

ABOUT THE AUTHOR

...view details