मुंबई - भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्तारूढ पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या. भाजपने 125 तर शिवसेनेने 70 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप-शिवसेना युतीचे जागावाटप अगोदरच निश्चित झाले असून भाजपला 164 तर शिवसेनेला 124 जागा मिळाल्या आहेत. भाजप आपल्या कोट्यातून घटक पक्षांसाठी जागा सोडणार आहे. मात्र, युतीच्या तिढ्यात काही शहरांमध्ये भाजपला कमी तर काही ठिकाणी शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आहेत. यात सर्वात जास्त शिवसेनेला महत्त्वाच्या शहरांमध्ये फटका बसला आहे.
हेही वाचा -चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाआघाडी, मनसेने बांधली मोट, एकत्र मिळून देणार उमेदवार
पूर्वी महाराष्ट्रात मोठा भाऊ वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या शिवसेनेला यंदा पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकही जागा भाजपने सोडलेली नाही. यामुळे पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहेच, शिवाय या महत्त्वाच्या शहरात शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहणार असल्याचे चित्र आहे.
शहर | जागा | शिवसेना | भाजप |
पुणे | 08 | 00 | 08 |
नाशिक | 03 | 00 | 03 |
नवी मुंबई | 02 | 00 | 02 |
नागपूर | 06 | 00 | 06 |
हेही वाचा -भाजप १२५ची यादी : पक्षावर अंकुश ठेवत कुरघोडी करणाऱ्यांना चाप लावण्यात 'देवेंद्रां'नी मारली बाजी
शिवसेना आता नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकही जागा लढवू शकणार नाही. भाजपने काल प्रसिद्ध केलेल्या यादीत या शहरांतील सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या शहरांमधली शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे काय? त्यांचे पुढे काय होणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजप उमेदवारांचा प्रचार करावा लागणार असून या ठिकाणांहून त्यांचे उमेदवार निवडून आल्यास भविष्यात येथे शिवसेनेच्या अस्तित्वाचाही प्रश्न उभा राहू शकतो.