महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2021, 8:05 PM IST

ETV Bharat / state

मुंबई महापालिका निवडणुकीवरून शिवसेना-भाजपात जुंपली

मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी, २०२२ मध्ये होणार आहे. निवडणुकीला जवळपास ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी, २०२२ मध्ये होवू घातली आहे. निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीवरून राजकारण सुरू झाले आहे. एकेकाळच्या मित्र असलेल्या आणि राज्यात सत्तेवरून दुरावा निर्माण झालेल्या भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष प्रतिष्ठेची करणार असल्याचे दिसून येत आहे.

भाजपाचा आरोप

मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी, २०२२ मध्ये होणार आहे. निवडणुकीला जवळपास ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. १ जून) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केला. शिवसेना कोरोनाचे कारण पुढे करून पालिका निवडणुक दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कारस्थान रचत आहे. काही प्रभाग फोडण्याचाही डाव असल्याचा आरोप शेलार यांनी केला. शिवसेनेचा जुनी प्रभाग रचना बदलण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो फसल्याच्या दावाही शेलार यांनी केला. ते म्हणाले की, "जे प्रभाग आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही, अशा प्रभागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहेत." नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच २०२१ च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. मात्र, शिवसेनेच्या या कुटील डाव फसणार असल्याचेही शेलार म्हणाले.

शिवसेनेने फेटाळले आरोप

शेलार यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगत शिवसेनेने हे आरोप फेटाळले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या निवडणुकीत स्वत:च्या कार्यकाळात विभाग फोडून आकडे मिळवले, ते आता निसटून जात असल्याचे दिसल्यानंतर शेलार यांच्याकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुळात शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. शिवसेना मुंबईत प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळे भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांना आरोप करत राहू दे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत टाकले जात आहेत. तिकडे मृत्यूचे तांडव सुरू असताना भाजपच्या नेत्यांना निवडणुकीची काळजी लागली आहे, असा टोलाही महापौरांनी लगावला आहे.

हेही वाचा -मेट्रो ३ : भुयारीकरणाचा ३८वा टप्पा पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details