महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभाही 'महायुती' एकत्रित लढणार; ठाकरे-फडणवीसांची ग्वाही

ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विजया निमित्त सिद्धी संकल्प विजय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभेतही महायुती अभेद्य राहील असे स्पष्ट केले.

By

Published : Jun 3, 2019, 11:33 PM IST

Updated : Jun 3, 2019, 11:55 PM IST

संपादित छायाचित्र

मुंबई- लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता विधानसभाही महायुती एकत्रित लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर दिली आहे. ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विजया निमित्त आयोजित केलेल्या सिद्धी संकल्प सभेत या दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभेतही महायुती अभेद्य राहील असे स्पष्ट केले.

ईशान्य मुंबई मधून माजी खासदार किरीट सोमैय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोटक यांच्या प्रचाराला येणेही टाळले होते. मात्र, विजय सिद्धी संकल्प मेळाव्याला ठाकरे यांनी हजेरी लावली. तसेच आगामी विधानसभेत पुन्हा नेत्रदीपक यश मिळवू, असेही सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण

देश वाचवण्यासाठी आम्ही समजूतदारपणा दाखवला-

भाजप आणि शिवसेनेत मतभेद होते, राजकारणात ते होत असते, पण देश वाचवण्यासाठी आम्ही समजूतदार पणा दाखवला. त्यामुळे विरोधकांची हवाच गेली. देश जपण्यासाठी युती केली आहे. विकासाचे शिवधनुष्य नरेंद्र मोदी यांनी पेलले आहे, त्यालाच आमचा पाठिंबा आहे, असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी आपल्या भाषणात किरीट सोमैय्या यांचा उल्लेख टाळला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सर्व कार्यकर्ते विजयाचे शिल्पकार आहेत. ही सभा म्हणजे मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्याची संधी आहे. या विजयाने निवडणुकीच्या पंडीतांनाही खोटे पाडले निवडणुकी पूर्वी आपण नवं भारताचे चौकीदार होतो. आता आपण नवं भारताचे सैनिक आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेतही हीच महायुती एकत्रित निवडणुका लढवून यश मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या आधी आशिष शेलार यांचे भाषण झाले, त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत आपण शेलार मामा असल्याचे सांगत आपणच परतीचे दोर कापले असल्याचे मिश्किल शब्दात सांगितले. नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी याप्रसंगी सांगितले की, जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत संसदेत काम करण्याची संधी दिली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य सिद्धी संकल्प करू.

Last Updated : Jun 3, 2019, 11:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details