मुंबई - देश कोरोना संकटात आणि आर्थिक मंदीत आहे. अशाही काळात पंतप्रधान बंगाल जिंकणार अशी घोषणा करत आहेत, तर गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल असे म्हणत आहेत. अमेरिकेत भयानक आर्थिक मंदी आली होती तेव्हा, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हुवर हे देशात सर्वकाही आबादीआबाद असल्याचे सांगत होते. तीच परिस्थिती सध्या भारतात असल्याचे सांगत शिवसेनेने म्हटले आहे, की देशात फक्त रुग्णालय आणि राजकारण तेवढे चालू आहे. स्मशाने, कब्रस्थानदेखील चोवीस तास चालू आहेत. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही. देशाला एका मनमोहन सिंगांची आणि रुझवेल्टची गरज असल्याचे सांगून मोदींनी आता टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे अशी 'रोखठोक' भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता रविंद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रेसिडेंट रुझवेल्टच्या भूमिकेत येऊन देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. देश संकटात असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण या कुठेही दिसत नसल्याची टीका करत, अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करुन त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट
देशाची आर्थिक स्थिती खालावत असताना राज्यकर्ते उदासीन आणि आत्मसंतुष्ट असल्याचे खरमरीत टीका खासदार राऊतांनी 'रोखठोक'मधून केली आहे. ते म्हणाले, 'आज देशात ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक चांगले अर्थतज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱ्यांचा प्रदेश आहे. 'हम बनिया लोग है' असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही 'आपण व्यापारी आहोत' असे वारंवार सांगितले, पण व्यापारीच दुकान थंडा करुन बसले आहेत.'