मुंबई -कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या दंगलप्रकरणातील मूळ सुत्रधार बाजूला ठेऊन बुद्धिजीवी लोकांना अटक केली होती. हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची SIT कडून चौकशी करण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सुत्रधारांना पाठीशी घालून, मुख्य मुद्यांवरून लक्ष हटविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप पवारांनी केला. पोलीस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली होती. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
'जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीये, शहर मैं अगर बगावत ना हो तो बहेतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये'. ही जर्मन कवीची अनुवादीत कविता सुधीर ढवळेंनी वाचल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातं जावई आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. गोलपीठामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घ्यावा. त्या कवितेकडे देशद्रोह आणि समाज विघातक म्हणून बघू नये असेही पवार म्हणाले.
भीमा कोरेगाव दंगलीस एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. यातील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. यामध्ये काही बुद्धिजिवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीकडून (SIT) चौकशी करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.