महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यावर्षी लालबाग मंडळ फक्त आरोग्योत्सवच साजरा करणार, शरद पावारांनी केले कौतुक - lalbag raja no ganesh utsav

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून आज 'आरोग्योत्सव' या प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पवारांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले. तसेच, महाराष्ट्रातील ९२ हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. याची सुरुवातही आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली.

शरद पवार, sharad pawar
शरद पवार

By

Published : Aug 4, 2020, 1:24 AM IST

मुंबई- दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणारे लाखो भक्त आणि त्यांची गर्दी लक्षात घेऊन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून आज 'आरोग्योत्सव' या प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पवारांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले. तसेच, महाराष्ट्रातील ९२ हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. याची सुरुवातही आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचबरोबर गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर लढताना वीरगती मिळालेले जवान सचिन मोरे व पुलवामामध्ये हुतात्मा झालेले जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांना आज प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाने या उपक्रमांद्वारे अतिशय चांगला आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. त्याबद्दल मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले. पवार म्हणाले की, लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव लालबागचा राजा मंडळाने आजपर्यंत साजरा केला आहे. भारत-चीन संदर्भात सुरू असलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, चीनच्या जवानांना त्यांची जागा दाखवायचे काम आपल्या सैनिकांनी यावेळी केले होते. चीन आणि सियाचीनच्या सीमेवर आपले जवान देशाचे संरक्षण करतात. मी संरक्षण मंत्री असताना १९९३ ला चीनला गेलो असताना तिथल्या पंतप्रधानांसोबत करार केला होता. लडाख सीमेवर शस्त्र संघर्ष करायचा नाही, असे ठरले होते. अशी आठवण पवार यांनी यावेळी करून दिली.

तर कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बजावण्यात येणाऱ्या भूमिकेचेही पवारांनी कौतुक करत रस्त्यावर फिरणारा मुलगा देखील पोलिसांना काका म्हणतो हे त्यांचे वेगळेपण आहे. ते आमच्या सर्वांचे रक्षण करतात. प्रत्येकाला मुंबई पोलिसांचा अभिमान आहे, असेही शरद पवार म्हणाले. दरम्यान शिवसेनेचे खासदार, अरविंद सावंत म्हणाले की, विरोधी पक्ष एवढा घसरत चालला आहे. त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. त्यांची सत्तेसाठी तडफड सुरू आहे. सुशांत सिंह प्रकरणात विरोधक राजकारण करत आहेत. परंतु, त्यांना हेही माहीत असले पाहिजे की बिहारचा मुलगा महाराष्ट्रात जातो आणि नाव कमावतो त्यावेळी त्यांना अभिमान का वाटत नाही. तसेच, आता 14 लाख कामगार बिहारमधून परत आले आहेत, त्यांचा विश्वास आहे म्हणून आले आहेत ना, असा सवाल करत सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही म्हणून त्यांचे महत्व कमी होत नासल्याचे देखील ते म्हणाले.

तर, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, बिहार पोलिसांच्या संदर्भात सुरू असलेल्या विरोधकांच्या राजकारणावर टीका केली. मुंबई महापालिका नियमानुसारच कार्यवाही करते, परंतु काहींनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा-सुशांतसिंह राजपूतच्या सीएची ईडीकडून चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details