महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2019, 9:18 PM IST

Updated : Oct 31, 2019, 12:02 AM IST

ETV Bharat / state

राज्यात एक जनशक्ती उभी करू या; शरद पवारांचे नवनिर्वाचित आमदारांना आवाहन

प्रश्नांची समरस होऊन ते सोडवण्यासाठी राज्यात एक जनशक्ती उभी करु या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवनिर्वाचित आमदार आणि कार्यकर्त्यांना केले.

बोलताना शरद पवार

मुंबई- राज्यातील जनतेने आपल्याला निवडून दिले. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला, आता आपली जबाबदारी सुरू झाली आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. उद्योग बंद पडले आहेत. रोजगाराचे प्रश्न निर्माण आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची समरस होऊन ते सोडवण्यासाठी राज्यात एक जनशक्ती उभी करु या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवनिर्वाचित आमदार आणि कार्यकर्त्यांना केले.

बोलताना शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित 54 आमदारांसह साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचाही पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पवार यांनी राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन केले.


राज्यात शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्याला त्यातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यक्रम राबविणार आहे. यासाठी आम्ही विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेत असून त्यासाठी कार्यक्रम राबवणार आहोत. त्यातून आमचा प्रत्येक आमदार शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या प्रश्नांसाठी वाहून घेईल, असे पवार म्हणाले.


निवडणुकीमध्ये आपल्या पाठीशी जाईल त्याठिकाणी तरुणांची शक्ती उभी राहिली होती. या तरुणांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह होता. त्या उत्साहाला योग्य दिशा दिली नाही तर त्यातून नैराश्य निर्माण होईल. त्यामुळे त्या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जनतेने आपल्याला निवडून दिले असून आता जनतेचा सुखदुखात जाऊन सहभागी झाले पाहिजे आणि त्यांना आपल्यात सामील करून घेतले पाहिजे. सामान्य माणसाचा आधार आपण बनू यासाठी आपण सर्वांनी आता काम करण्याची गरज आहे. लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांनी त्यांचे काम केले आता आपण त्यांची कामे करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.


राज्यात जे उद्योग बंद पडलेले आहेत. त्यांचा सर्व अभ्यास करून ते सुरू कसे होतील यासाठी कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. यासाठी आम्ही काही लोकांवर जबाबदारी सोपविण्यात असल्याचे पवार यांनी सांगितले.


आपण नागरी क्षेत्रात कमी पडलो असल्याची कबुली देत पवार यांनी त्यातील मुंबई आणि ठाण्यात आपल्याला चांगले यश मिळाले नाही. त्यामुळे नागरी भागातील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपल्याला काम करावे लागेल. विशेषत: मुंबईतील लोकांच्या प्रश्नावर फोकस करावा लागणार असून त्यासाठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


7 नोव्हेंबरला राम मंदिराचा निकाल येणार असून त्यानंतर राज्यात काही शक्ती धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करतील. त्यामुळे समाजात सलोखा निर्माण राहील यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

Last Updated : Oct 31, 2019, 12:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details