मुंबई - कोरोना आणि त्यांनतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक प्रकारच्या अडचणी असल्या तरी राज्यात जून महिन्यात शाळा आणि त्यांचे शिक्षण सुरू होणार आहे. मात्र या शाळा प्रत्यक्षात न भरता ऑनलाईन अथवा डिजिटलच्या माध्यमातून सुरू केल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव नाही अशा आदिवासी, दुर्गम भागातील शाळा मात्र नियमित सुरू केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल तीन तास आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यासाठीचा एक आढावा घेतला. त्यात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळांचे शिक्षण हे नियमित वेळेत सुरू करा, मात्र ते ऑनलाईन आणि परिस्थिती पाहून ऑफलाईन पद्धतीने करावे, असे निर्देश दिले आहेत.
आज झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही, ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्या शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. तर दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे.