महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : पुस्तकं मिळाली पण, आमच्या पोरांनी शिकायचं कसं? ग्रामीण भागातील पालकांचा प्रश्न - Rural Students dilemma News

शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच पहिली ते आठवीपर्यंतच्या तब्बल 1 कोटी 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, या पुस्तकांमधून काय शिकायचे असा प्रश्न ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थी व पालकांपुढे पडला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत तर ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण पोहचलेले नाही, यामुळे आमच्या पाल्यांचे भवितव्यच अंधारात सापडले असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून येत आहेत.

School
शाळा

By

Published : Jul 10, 2020, 2:50 PM IST

मुंबई - राज्यात 15 जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा मात्र प्रत्यक्षात भरू शकलेल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा खटाटोप केला, त्यानंतरही ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून कोसो दूर राहिला आहे. परिणामी शिक्षण विभागाने यंदा वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली असली तरी शाळाच सुरू नसल्याने या पुस्तकातून आमच्या पोरांनी शिकायचे कसे, असा प्रश्न ग्रामीण भागातील पालकांपुढे पडला आहे.

मुंबई, पुणे आदी महानगरपालिकांचा अपवाद वगळता शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच पहिली ते आठवीपर्यंतच्या तब्बल 1 कोटी 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, या पुस्तकांमधून काय शिकायचे असा प्रश्न ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थी व पालकांपुढे पडला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत तर ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण पोहचलेले नाही, यामुळे आमच्या पाल्यांचे भवितव्यच अंधारात सापडले असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून येत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण झाले मात्र, ऑनलाइन शिक्षण पोहचलेले नाही

विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यामध्ये फिरत असतो. या भागातील भटक्या-विमुक्त, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ऑनलाइन शिक्षण कसे देणार आहे, हे अजूनही उमगलेले नाही. यंदा पहिल्यांदाच दिवाळीच्या पूर्वी पुस्तके मिळाली आहेत. मात्र, आता शाळा सुरू नाहीत, शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, त्यामुळे शिक्षणही नाही. त्यामुळे मिळालेल्या पुस्तकांचा उपयोग काय, असे संघर्ष वाहिनीचे संघटक मुकूंद आडेवार यांनी सांगितले.

मेळघाटात एकदा शिक्षक आले व पुस्तकांचे वाटप करुन गेले. त्यानंतर पुन्हा ते शाळेत आले नाहीत त्यामुळे मुलांचा अभ्यासही नाही. मुलांना पुस्तके मिळाली परंतु शिक्षण सुरू नसल्याने कुणी जनावरे चारत फिरतेय तर कोणी असेच गावात फिरत आहेत. मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळेल असे सांगितले, अद्याप त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कसे शिक्षण मिळणार, असा प्रश्न पडल्याचे चिखलदऱयाच्या राहू गावातील शामराव कासदेकर म्हणाले.

गावात काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली आहेत. पण शिक्षण सुरू झालेले नाही. परिसरातील बोरगा, मदनापूर गावातही अशीच परिस्थिती आहे. शाळा व्यवस्थापन समित्या नावापुरत्याच असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याचे कालपाणी गावातील उषाताई बेलसरे यांनी सांगितले.

ठाणे, पालघर जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही काय आणि कसे शिकायचे असा प्रश्न पडला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा मोठा बाऊ केला जात असून तळापर्यंतचे वास्तव वेगळे असल्याचे समर्थन संस्थेचे रूपेश कीर यांनी सांगितले.

राज्यात ९ कोटी ९९ लाख पुस्तकांचे वितरण -

राज्यात बालभारतीकडून यंदा पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ९ कोटी ९९ लाख पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. त्यात पहिली ते आठवीच्या पुस्तकांची संख्या ५ कोटी ७३ लाख ४३ हजार इतकी आहे. यातील सर्व पुस्तके १५ जूनपर्यंत बालभारतीच्या पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, गोरेगाव, नागपूर, नाशिक आणि पनवेल डेपोतून पोहोचवली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

समग्र शिक्षा अभियानाकडून ३१ लाख पुस्तके -

समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात. एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेतून ३१ लाख ३२ इतकी पुस्तके वितरीत करण्यात आली असल्याचे समग्र शिक्षा अभियानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईत कोरोनामुळे वितरणात अडचणी -

मुंबईत कोरोनामुळे महानगरपालिका शिक्षण विभागाला पाठ्पुस्तके पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आत्तापर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १७ लाख ४९ हजार पुस्तकांची मागणी होती, त्यातील ९० टक्केहून अधिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details