मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच, असे म्हणत रोहित पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना टोला लगावला आहे. तसेच राष्ट्रवादीत नसता तर आपणास कोणी आमंत्रणही दिलं नसतं असेही पवार म्हणाले.
'राष्ट्रवादीत नसता तर तुम्हाला कोणी आमंत्रणही दिलं नसतं' - रोहित पवार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच पक्षांतरावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतीलही पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. आपण राष्ट्रवादीत नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं, असे रोहित पवार म्हणाले.