महाराष्ट्र

maharashtra

कंगनाला न्याय द्या; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

By

Published : Sep 11, 2020, 1:34 PM IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कंगना रणौत प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनाचे कार्यालय तोडून मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचा आरोप आठवले यांनी केला.

Kangana Ranaut issue
कंगणा रणौत प्रकरण

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कंगना मुंबईत नसताना मुंबई महानगरपालिकेने तिचे कार्यालय तोडले. नोटीस देऊन फक्त 24 तासात कार्यालय तोडणे हा अन्याय आहे. महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. राज्यपालांना भेटून कंगनाला न्याय मिळाला पाहिजे, तिला नुकसान भरपाई देखील मिळाली पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कंगणाला न्याय देण्याची मागणी केली

मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाचे आरक्षण टिकू शकले नाही, याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने योग्य भूमिका मांडणे आवश्यक होते. मात्र, सरकारने तसे केले नाही. त्यामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार कोरोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसते आहे. सरकार फक्त आपण केलेल्या कामाचा गाजावाजा करते, असे आठवले म्हणाले. कोझिकोड विमान अपघातामध्ये दीपक साठे यांनी असंख्य प्रवाशांना जीवदान दिले. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांना मरणोत्तर पद्मश्री देण्याची मागणीही आठवले यांनी राज्यपालांकडे केली.

ABOUT THE AUTHOR

...view details