मुंबई -वसई-विरार रुग्णालय आग दुर्घटनेप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विरारमधील रुग्णालयाच्या आयसीयू विभागात लागलेेल्या आगीत १३ रुग्ण दगावले आहेेेत.
काय म्हणाले राजेश टोपे?
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. माझ्याकडे शब्द नाही. हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. विरार महानगर पालिकेचे आयुक्त संबंधीत अधिकारी यांच्याशी तसेच आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी पण बोलणे झाले. भंडाऱ्याला जशी घटना घडली तशीच ही घटना आहे. एसीमध्ये स्फोट होऊन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याची चौकशी केली जाईल.
आगीच्या दुर्घटनेनंतर त्या परिसरात एकदम धूर पसरला. त्यामुळे गुदमरून 13 रुग्णांचा जीव गेला. पण दरवाजाच्या जवळ असलेल्या रुग्णांना वाचवता आले. फायर ऑडिट करण्याच्या सूचना आधीच करण्यात आल्या होत्या. खासगी लोकांकडून हे वल्लभ हॉस्पिटल चालवण्यात येत होते. ऑडिट झाले होते का? स्फोट कसा झाला? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
रात्रीच आगीवर नियंत्रण -
आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले होते. विजय वल्लभ रूग्णालयात रुग्णालय प्रशासनाची स्वत:ची आगीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.