मुंबई - पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते. पोस्टर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. आम्ही लोकसेवक आहोत, जनसेवा करत राहू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीमध्येच स्पर्धा - विरोधकांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीची परिस्थिती 'तीन तिघाडा काम बिघाडा' अशी आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते. पोस्टर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. आम्ही लोकसेवक आहोत आणि लोकसेवा करत राहू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवारांची प्रतिक्रिया -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे विधान केले होते. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्या तोंडात साखर पडो आणि त्यांचे म्हणणे खरे ठरो. त्यामुळे येत्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडतील हे नक्की आहे.
अजित पवारांचे सूचक विधान - बंडानंतर शिंदे सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात सध्या राखीव आहे. त्यापूर्वीच राज्यात नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यासंदर्भातले वेगवेगळे विधाने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जात आहेत. मी आताही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सूचक विधान अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यानंतर जयंत पाटलांचे मुख्यमंत्री होण्याबाबतचे विधान येणे, यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा -Ajit Pawar on CM Post : जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो अन् त्यांचं म्हणणं खरं ठरो; अजित पवारांचा टोला