मुंबई - राज्याला पुन्हा कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात दररोज सरासरी 55 हजार रूग्ण कोरोनाबाधित होत आहेत. राज्यात वाढणारी रूग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील खासगी रूग्णालयांमध्ये नागरिकांची लूट होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यात आता खासगी रूग्णवाहिका चालकांची भर पडल्याचे चित्र आहे. हे रूग्णवाहिका चालक नागरिकांची लूट करत असल्याचा आरोप होत आहे.
रूग्णवाहिका चालक नागरिकांची लूट करत असल्याचे आरोप होत आहेत रूग्णवाहिका चालक लूट करत असल्याचा आरोप -
पीपीई कीटमध्ये मृत कोरोनाबाधिताला सुरक्षितरित्या स्मशानामध्ये पोहचवण्यासाठी रूग्णवाहिकांची आवश्यकता असते. एका किलोमीटरच्या अंतरासाठी खासगी रूग्णवाहिकेचे भाडे साधारण 1 हजार ते 1 हजार 200 असते. मात्र, सध्या रूग्णवाहिका चालक सर्रासपणे 4 ते 5 हजार भाडे आकारतात. कोविडच्या काळात अनेक सेवाभावी संस्था मोफत रूग्णवाहिकांची सुविधा पुरवत आहेत. मात्र, काही खासगी चालक स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत.
मुंबई मनपाच्या 240 रूग्णवाहिका गेल्या कुठे?
2020 मध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, 24 वार्डमध्ये प्रत्येकी 10 रूग्णवाहिका दिल्या होत्या. कालांतराने कोरोना कमी झाला आणि त्यांची मागणी घटली. आता दुसरी लाट आली आहे. अगोदरच्या रूग्णवाहिका गेल्या कुठे? असा प्रश्न पडला आहे. शासकीय रूग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने, नागरिकांना जास्त पैसे देऊन खासगी रूग्णवाहिका वापराव्या लागत आहेत.