मुंबई Prakash Ambedkar Demand :देशातील पाच महत्त्वाच्या मंदिरांवर हल्ला करून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालीय. हिंदू धर्मियांच्या मतांचं केंद्रीकरण करून आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्यामुळं निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि देशात शांतता राहावी, यासाठी पाच महत्त्वाची मंदिरं सैन्याच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केलीय.
सिरीयस विधेयक नाही :लोकसभेचं विशेष अधिवेशन ज्यावेळेस जाहीर झालं, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही भूमिका मांडलीय की हे फोटोसेशन आहे. जो काही अजेंडा काल बाहेर आलाय, त्यावरून असं दिसतंय की, कुठेही सिरीयस विधेयक नाही. राज्यसभेनं मंजूर केलेलं बिल लोकसभेमध्ये मंजूर करायचं, हा एवढाच फक्त अजेंडा आहे. त्यामुळं 2000 च्या नोटबंदीचा दुसऱ्यांदा निर्णय झाला, तर निवडणुका नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलीय. या दोन्ही भूमिका आपल्याला 25 तारखेपर्यंत स्पष्टपणे समजतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
दंगल घडवण्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न :गेल्या नऊ वर्षामधलं राजकारण बघता एखाद्या समाजावर अत्याचार करायचा. त्याच्यातून दहशत निर्माण होईल असा प्रयत्न करायचा, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या नावाचा वाद काढण्याच्या प्रयत्न या ठिकाणी झाला. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं तो वाद त्या ठिकाणी थांबलाय. आता मराठी विरुद्ध ओबीसा असा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. म्हणजे देशांमध्ये अशांतता कशी राहील, याचा प्रयत्न सुरू असतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या माहितीवरून हिंदू धर्मीयांच्या जिव्हाळ्याच्या मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.