मुंबई - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा निर्णय घेतला. मुंबईतील काही शाळांनी विविध सोशल माध्यमांच्या आधारे ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा केला. मात्र, यात अनेक तांत्रिक तृटी असल्याचे जाणवत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला हा विशेष आढावा.
'ऑनलाइन शिक्षण नको शाळेत जायचंय...' ऑनलाईन शिक्षणामुळे सर्वांत जास्त चिंता वाढलीय ती पालकांची. घरी ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलांचं लक्ष वीचलीत होऊ नये म्हणून घरात शांतता ठेवावी लागते आहे. तर एकाच घरी दोन मुलांचे ऑनलाईन वर्ग असल्याने मोबाईल, लॅपटॉप यांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यात मुलांचा मूडही सांभाळायला लागतोय, असे पालक उज्वला बरोड यांनी सांगितले.
झूम अॅपने ऑनलाइन क्लास सुरू असताना शिकवताना काही गोष्टी कळत नाहीत. मग चॅटमध्ये प्रश्न लिहून पाठवावे लागतात. ऑनलाईन वर्ग सुरू असताना आजूबाजूचा आवाज येतो आणि पूर्णपणे लक्ष देता येत नाही. नेटवर्क समस्या होते आणि मध्येच लेक्चर बंद होते. शिक्षकांचा आवाज नीट ऐकायला येत नाही, असे अंधेरीतील ज्ञान केंद्र शाळेत शिकणाऱ्या दहावीतील दिव्या बरोड या विद्यार्थ्यांनीने सांगितले.
तर अंधेरीच्याच हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या आरव बिर्जे यांनी तर ऑनलाईन स्कुलमध्ये मज्जा करता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही. त्यामुळे शाळेत जायचंय असा हट्ट केला.
ऑनलाईन वर्गात एकावेळी 53 विद्यार्थी असतात. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरू असतो. एक तास एक विषय शिकवला जातो. शिकवताना अनेकदा शिक्षकांचा आवाज नीट ऐकू येत नाही. त्यामुळे पूर्णपणे शिकवलेलं समजत नाही. म्हणून ऑनलाईन वर्ग लवकर बंद करुन शाळा सुरू करावी, असे इयत्ता नववीत शिकणाऱ्या यशवी बिर्जे या विद्यार्थीने सांगितले.
विद्यार्थ्यांना शाळेत समोर शिकवताना अधिक प्रभावीपणे शिकवले जाते. मात्र, कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण काळाची गरज ठरली आहे. विद्यार्थी घरी नुसते रिकामे बसण्यापेक्षा त्यांच्या इयत्तेनुसार त्यांना सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न असतो. वर्गात विद्यार्थी समोर असतो त्यामुळे तो काय करतो त्याचे शिकवण्याकडे लक्ष आहे की नाही, हे कळतं. मात्र, ऑनलाईन शिक्षणामुळे समोर विद्यार्थी काय करतोय, हे लक्षात येत नाही असे शिक्षक मानसी चाळके यांनी सांगितले.
हेही वाचा-Exclusive : 'आंतरराष्ट्रीय योग दिवसा'च्या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांची विशेष मुलाखत..